Aurangabad district Bank : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 20 संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत बिनविरोध आणि मतदानातून निवडून आलेल्या संचालकांमध्ये शिवसेनेने सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या. तर मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलेल्या भाजपचे सात संचालक विजयी झाले आहेत.
जिल्हा बँकेत मोठा भाऊ ठरलेल्या शिवसेनेकडून आता अध्यक्षपदावर दावा सांगितला जाणार आहे. शिवसेनेकडून खासदार संदिपान भुमरे यांनी निवडणुकीची सूत्र सांभाळली असली तरी पडद्यामागील साम, दाम, दंड, भेद या चाली अब्दुल सत्तार यांनीच खेळल्या. जिल्हा बँकेच्या राजकारणाचा अब्दुल सत्तार यांना दांडगा अनुभव असल्याने आता मुलाला अध्यक्ष करण्यासाठी ते पुढील रणनीती आखत आहेत.
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आक्रमक झालेल्या अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अध्यक्षपदाचा शब्द मिळवल्याची सूत्रांची माहिती आहे. तो शब्द मिळाल्यानंतरच सत्तार यांनी मुलगा समीर याची विधान परिषदेची उमेदवारी मागे घेतली होती. आता अध्यक्षपदाचा शिवसेनेला दिलेला शब्द भाजप पाळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकी वेळी अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी कायम ठेवली असती तर महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाट यांना दगाफटका झाला असता. शिवसेनेकडून हिरावून घेतलेली जागा कुठल्याही परिस्थितीत गमावणे भाजपाला परवडणारे नव्हते आणि म्हणूनच सत्तार यांच्या भूमिकेपुढे इच्छा नसतानाही भाजपच्या नेतृत्वाला नमते घ्यावे लागले होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीत सुहास शिरसाट हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यामुळे अब्दुल सत्तार यांना दिलेला शब्द भाजपला आता पाळावा लागणार आहे? तर दुसरीकडे जिल्हा बँकेवर सत्ता आणि वर्चस्व मिळवण्याची चालून आलेली संधी मंत्री अतुल सावे सहजासहजी सोडतील का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या काही महिने जिल्ह्यात भाजपने ज्या पद्धतीने मित्रपक्षांच्या विरोधात रणनीती आखली आहे ती पाहता जिल्हा बँकेसाठी भाजप अब्दुल सत्तार यांना दिलेला शब्द फिरवू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या राजकीय खेळीचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पुरेपूर अंदाज आलेला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत मोठा भाऊ ठरलेला असतानाही शिवसेना पूर्णपणे अध्यक्षपदासाठी भाजपवर अवलंबून राहील, असे वाटत नाही. अब्दुल सत्तार हे बाजी पलटवण्यात पटाईत मानले जातात.
भाजपकडून अध्यक्षपदाचा शब्द फिरवला जाण्याची कुणकूनही सत्तार यांना लागली तर ते काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या मदतीने आणि भाजपमधील काही आपल्या समर्थक संचालकांना हाताशी धरून थेट अध्यक्षपद मुलासाठी खेचून आणू शकतात. भाजपने ही वेळ सत्तारांवर आणली तर मात्र जिल्हा बँकेच्या राजकारणात महायुतीमध्येही बिघाडी होऊ शकते. शिवसेनेकडे नऊ संचालक असल्यामुळे अध्यक्ष पदासाठी त्यांना दोन संचालकांचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळे भाजपकडून दगाफटका झाला तर अब्दुल सत्तार यांचा बी प्लान तयार असणार आहे.
जिल्हा बँकेत 20 पैकी 19 जागा महायुतीने पटकावल्या आहेत. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे वाटप तिन्ही पक्षांना केले जावे, असा फॉर्मुला समोर येत आहे. दोन-दोन वर्ष अध्यक्षपद शिवसेना भाजप यांच्याकडे तर एक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. हा फॉर्मुला अमलात आणला तर शिवसेनेकडे पहिली दोन वर्षे अध्यक्ष पद आणि भाजपकडे उपाध्यक्ष पद राहू शकते.
लवकरच महायुतीचे निवडून आलेले सर्व संचालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. या भेटीतच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा फॉर्मुला फायनल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा फॉर्मुला शिवसेनेला मान्य होतो की मग अब्दुल सत्तार पूर्ण पाच वर्ष अध्यक्षपदासाठी आग्रही राहतात? यावर जिल्हा बँकेच्या राजकारणातील पुढील संघर्ष अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.