Dcm Devendra Fadanvis-Abdul Sattar News, Aurangabad
Dcm Devendra Fadanvis-Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : महावसुलीचे आरोप असलेल्या कृषी महोत्सवाकडे फडणवीसांनी पाठ फिरवली..

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political : वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटप व सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी महावसुलीवरून आरोप झालेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अधिवेशन काळात जोरदार बचाव केला. विरोधकांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृह डोक्यावर घेतले पण फडणवीसांनी सत्तारांसाठी आपली शक्तीपणाला लावत त्यांचा बचाव केला.

हिवाळी अधिवेशनात सत्तारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आणि त्यांच्यासाठी विरोधकांना अंगावर घेणारे देवेंद्र फडणवीस सत्तारांवर (Abdul Sattar) नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे काल उद्धाटन झाले. (Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदीपान भुमरे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी महोत्सवाला हजेरी लावली. पण अध्यक्षस्थानी असलेल्या फडणवीसांनी मात्र महावसुलीचे आरोप असलेल्या महोत्सवाकडे पाठ फिरवली.

विशेष म्हणजे आज फडणवीस औरंगाबादेत असून देखील त्यांच्या महोत्सवाला भेट देण्याचा कोणाताही कार्यक्रम नाही. त्यामुळे अधिवेशनात भक्कमपणे सत्तारांच्या पाठीशी उभे राहिले असले तरी फडणवीसांची त्यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन सत्तार यांच्यावर नागपूर खंडपीठाने ओढलेले ताशेरे आणि कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कृषी खात्यामार्फत सुरू असलेल्या वसुलीची आरोपांमुळे गाजले. विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेत या दोन्ही मुद्यांवरून सत्तारांचा राजीनामा मागितला.

एवढेच नाही तर शिंदे-फडणवीस सरकारवर दबाव वाढवण्यासाठी इतर मंत्र्यांची प्रकरणे देखील बाहेर काढली. पण शिंदे आणि फडणवीसांनी विरोधकांचा विरोध मोडून काढत सत्तारांना सेफ केले. फडणवीसांनी तर सत्तारांची बाजू सभागृहात अशी लावून धरली जणू काही सत्तार गेल्या कित्येक वर्षापासून भाजपमध्येच होते. परंतु सरकार बॅकफूटवर गेले असे चित्र निर्माण होवू नये या भूमिकेतूनच फडणवीसांनी सत्तारांचा बचाव केला, अशी चर्चा आहे.

त्यामुळेच अधिवेशन संपल्यानंतर फडणवीसांनी सत्तारांच्या कृषी महोत्सवाला जाणे टाळले. सत्तारांच्या अतिउत्साहीपणामुळे फडणवीस त्यांच्यावर आधी देखील नाराज होते. परंतु सभागृहात त्यांच्यावर गायरान जमीन वाटप आणि कृषी महोत्सवासाठीच्या वसुलीवरून झालेल्या आरोपांमुळे सरकारची नाचक्की झाली, आणि हे फडणवीसांना खटकले. त्यामुळे राजकीय अपरिहार्यता म्हणून सभागृहात सत्तारांचा बचाव करणाऱ्या फडणवीसांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे अध्यक्षस्थान भूषवणे टाळत सत्तारांना द्यायचा तो इशारा दिलाच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT