Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, Aurangabad
Mp Imtiaz Jalil-Prakash Ambedkar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : एमआयएमला पुन्हा `वंचित`ची गरज भासू लागली ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : दिवाळी झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला वेग येणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणाशी युती करणार? याच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आपलं चांगभलं करून घेतलं होत. दलित-मुस्लिम मतांच्या जोरावर एमआयएमचे इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

देशभरात या विजयाची चर्चा आणि कौतुक देखील झाले. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या राज्यभरातील उमेदवारांना तब्बल ४० लाख मते मिळाल्या दावा प्रकाश आंबेडकरांनी केला होता. असे असतांना विधानसभा निवडणुकीत मात्र आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडली आणि स्वबळावर निवडणुका लढवल्या. त्यामुळे (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकरांना बडे भाई म्हणणाऱ्या (Aimim) एमआयएमच्या यशाला देखील राज्यात ब्रेक लागला.

आता महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या तशा युती आणि आघाडीच्या चर्चा देखील झडू लागल्या. राज्यातील सत्तातंरानंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केली आणि आता वंचितसोबत देखील त्यांची बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. यावर भाष्य करतांना एमआयएमचे खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपण अजूनही वंचितसोबत जाण्यास तयार असल्याचे सरकारनामाशी बोलतांना सांगितले होते. आता पुन्हा एकदा वंचितसोबत जाणार का? या प्रश्नावर इम्तियाज यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू नेते असल्याचे म्हणत स्तुतीसुमने उधळली, पण त्याच बरोबर त्यांच्या भोवती आरएसएस विचारसरणीच्या लोकांचा गराडा असल्याचा गंभीर आरोप देखील केला. त्यामुळे एमआयएम आणि वंचित पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमीच दिसते. याचा सर्वाधिक फटका हा एमआयएमला औरंगाबाद महापालिकेत बसण्याची शक्यता आहे. महापालिकेवर एमआयएमचा महापौर बसवण्याचे स्वप्न इम्तियाज जलील पाहत आहेत.

पण लोकसभेच्या वेळी जुळून आलेले दलित-मुस्लिम समीकरण असेल तरच ते शक्य होईल हे इम्तियाज यांना देखील माहित आहे. त्यामुळे ते अधूनमधून वंचितसोबत जाण्याची भाषा करतात. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या वंचित आघाडीच्या कुठल्याही नेत्याने त्याला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. कारण यावर दुसऱ्या बाजूने काहीच प्रतिक्रिया येत नाहीत. याचाच अर्थ एमआयएमचे हे वंचितबद्दल असलेले एकतर्फी प्रेमच म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने वंचितचा वापर करून घेतला असा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीच्यावेळी वंचित-एमआयएमच्या युतीच्या बोलणीची जबाबदारी ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टाकली होती. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी त्यावेळी मी पक्षाच्या अध्यक्षांशीच बोलेण अशी भूमिका घेत इम्तियाज यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला होता.

तेव्हा देखील इम्तियाज यांनी आंबेडकरांवर त्याचे आरएसएसशी संबंध असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे वंचित पुन्हा एमआयएमच्या वाट्यावर जाणार नाही असे दिसते? तर दुसरीकडे एमआयएमला मात्र महापालिकेतील सत्तेसाठी वंचितची गरज भासू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT