MNS Aurangabad
MNS Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : मनसेचीही पाण्यासाठी संघर्ष यात्रा ; मुख्यमंत्र्यांना पाठवणार २५ हजार पत्र..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शहाराचा पाणी प्रश्न आणि त्यावरून राजकारण सध्या जोरात सुरु आहे. भाजपकडून आंदोलन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासकांची भेट घेतली होती. (Aurangabad) तर येत्या २३ मे रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी प्रश्नावर महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात आता (MNS) मनसेनेही आपली भूमिका स्पष्ट करत १४ मे पासून पाणी संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केली आहे.

मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषदेत या संघर्ष यात्रेची घोषणा केली. २५ वर्ष शिवसेनेचे महापालिकेवर (Marathwada) सत्ता होती, पण त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने वार्डावार्डात २५ हजार पत्र घरोघरी जाऊन दिली जाणार आहेत. ती नागरिकांकडून लिहून घेतल्यानंतर मुख्मंत्र्यांना पाठवली जाणार आहेत.

शहराचा पाणी प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. समांतर जलवाहिनी रद्द झाल्यानंतर फडणवीस सरकारने घोषित केलेली १६८० कोटींची योजना देखील आघाडी सरकारने बदलली आणि आता ती देखील संथगतीने सुरू आहे. परिणामी औरंगाबादकरांच्या नशिबी ८ दिवसाआड पाणी मिळण्याची वेळ आली आहे. भाजप, मनसे या विरोधी पक्षांकडून या पाणी प्रश्नाला शिवसेनेला जबाबदार धरण्यात येत आहे.

भाजपच्या सुरात सूर मिसळत मनसेने देखील शिवसेनेच्या विरोधात रस्त्यावर उतरून पाणी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार येत्या १४ मे पासून ही पाणी संघर्ष यात्रा शहरातील प्रत्येक वार्डात जाणार आहे. २५ हजार नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून पाठवण्यासाठी पत्रांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. नंतर हीच पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.

यावेळी मनसेच्या वतीने काही मागण्या आणि सत्ताधारी शिवसेना व महापालिकेतील अधिकाऱ्यांवर काही आरोपही करण्यात आले. यात प्रामुख्याने ५० टक्के पाणीपट्टी माफ करा, सिडको-हडको भागासाठी ४० ते ५० एमएलडी पाण्याचे नियोजन करा, मनपाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ८५ पैकी फक्त ४० टॅंकरवर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे, इतरांशी अधिकारी, माजी नगरसेवकांचे साटेलोटे आहे का? १६ एमएलडी पाणी दररोज वाया जाते, जे शहरातील दीड लाख नागरिकांना पुरू शकते, याला जबाबदार कोण? यासह अनके प्रश्न मनसेच्या वतीने महापालिकेला विचारण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT