Congress, Aurangabad
Congress, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : दिल्लीत अन् गल्लीतही काॅंग्रेसला आता कोणी विचारेना?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : देशाच्या सत्तेत सर्वाधिक काळ राहिलेल्या राष्ट्रीय काॅंग्रेसची अवस्था स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अत्यंत वाईट झाली आहे. (Congress) दिल्लीत अन् गल्लीतही या पक्षााला आता कोणी विचारेनासे झाले आहे. (Aurangabad) महापालिका प्रशासक आस्तीककुमार पांडेय यांना शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या नेतृत्वाखील विविध मागण्यांचे निवदेन घेऊन गेलेल्या शिष्टमंडळाला तासभर ताटकळत ठेवल्यानंतरही पांडेय भेटले नाही. (Marathwada)

त्यामुळे संतप्त झालेल्या काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रसासकांचा निषेध करत महापालिकेतून काढता पाय घेतला. एवढेच नाही तर प्रशासक हटवा, अशी मागणी देखील केली. २०१९ च्या लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा धुव्वा उडाला. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात तर पक्षाची अब्रूच वेशीला टांगली गेली, पण ज्या पंजाबमध्ये वर्षानुवर्षे काॅंग्रेसची एकहाती सत्ता होती, तिथे देखील नवख्या आम आदमी पक्षाने पक्षाला धूळ चारली.

या पराभावचे पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटत असतांनाच त्याचा परिणाम आता स्थानिक पातळीवर देखील दिसू लागला आहे. कधी काळी काॅंग्रेस पक्षाची मजबुत पकड असलेल्या औरंगाबाद शहरात आता काॅंग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि राज्यस्तरावरील नेत्यांचे उदासीन नेतृत्व यामुळे काॅंग्रेसला अधिकच मरगळ आली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन काॅंग्रेस त्यात सहभागी झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसा उत्साह निर्माण झाला होता. पण राज्याच्या सत्तेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याने निधी मिळत नाही, आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, अशी ओरड मंत्री आणि राज्याच्या नेत्यांकडूनच होऊ लागली. त्यामुळे सहाजिकच याचा परिणाम जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर झाला.

काॅंग्रेसमध्ये नुकत्याच संघटनात्मक जबादाऱ्यांचे वाटप झाले. शहराध्यक्षांनी कार्यकारणी जाहीर केली आणि त्यावरून नाराजी नाट्य सुरू झाले. ज्यांनी कधी गांधी भवनाची पायरी चढली नाही, अशा लोकांना पदांची खैरात वाटण्यात आल्याचा आरोप खान नावच्या पदाधिकाऱ्याने केला होता. पक्षाला सर्वमान्य नेतृत्वच नसल्याने जिल्हाध्यक्षाचे तोंड एका दिशेला तर शहराध्यक्षाचे दुसऱ्या अशी अवस्था आहे. त्यामुळे काॅंग्रेस पक्षाला व त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रशासनातील अधिकारी देखील हलक्यात घेत असल्याचे दिसत आहे.

याचे ताजे उदाहरण म्हणजे शहर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या प्रश्नावरील निवेदन घेऊन गेलेल्या शिष्टमंडळाला महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दीड तास ताटकळत ठेवले. केबीन बाहेर वाट पाहत बसलेल्या शिष्टमंडळाला अखेर भेट न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागले.

एमआयएम, मनसे, भाजप सारख्या पक्षांना प्रशासक वेळ देतात, त्यांचे म्हणणे तासनतास ऐकून घेतात. पण एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना साधी भेट देत नाही याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. रमझान महिना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर उस्मानी यांनी नियमित पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेज व इतर नागरी सुविधा पुरवण्याची मागणी निवदेनात केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT