Basavraj Patil Murumkar Sarkarnama
मराठवाडा

Basavraj Patil Murumkar : बसवराज पाटलांची जबाबदारी वाढली; उमरग्यात काँग्रेसला पुन्हा 'अच्छे दिन' येणार?

अय्यूब कादरी

Dharashiv Political News : काँग्रेसचे प्रदेश कार्याध्य़क्ष, माजी मंत्री बसवराज माधवराव पाटील (मुरुमकर) यांची जबाबदारी आता वाढली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जाणारे बसवराज पाटील हे पक्षाचे निष्ठावंत आहेत. मंत्रिपद, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्षपद आणि त्यानंतर आता आणखी महत्त्वाची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या निष्ठेचे फळ दिले आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणूक समन्वय समितीत त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज पाटील आणि नसीम खान यांच्यासोबत स्थान मिळाले आहे. पाटील यांच्या धाराशिव जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही. खासदारही शिवसेनेचे (ठाकरे गट) आहेत. त्यामुळे पक्षाचे आमदार निवडून आणण्याचा दबाव पाटील यांच्यावर राहणार आहे. (Latest Political News)

बसवराज पाटील (Basavraj Patil) हे मुरूम (ता. उमरगा) येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. १९९२ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी मिळाले होते. १९९५ मध्ये त्यांनी उमरगा विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. १९९९ च्या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्रिपद दिले. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. २००९ च्या निवडणुकीपासून उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे पाटलांनी शेजारच्या औसा (जि. लातूर) मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली.

औसा मतदारसंघासाठी ते नवे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची उमरग्यातील फळी तेथील कार्यकर्त्यांच्या सोबत मिळून कामाला लागली. उमेदवारी मिळाल्यानंतर अगदी कमी वेळेत औशात बस्तान मांडून त्यांनी विजय खेचून आणला. पाटील यांना औशातून उमेदवारी मिळाल्यामुळे उमरगा मतदारसंघातील त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार डाॅ. बी. पी. गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते. २०१४ च्या निवडणुकीतही ते औसा मतदारसंघातून विजयी झाले.

दरम्यान, २०११-१२ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील यांच्या मदतीने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना धक्का दिला. विलासरावांच्या पक्षांतर्गत विरोधी गटातील पंडित धुमाळ हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यावेळी पाटील यांचा देशामुखांसोबतचा संघर्ष उघडपणे समोर आला होता. २०१९ च्या निवडणुकीत औशातून पाटील यांचा पराभव झाला. (Maharashtra Political News)

शिवराज पाटील यांचे वजन नेहमीच बसवराज पाटील यांच्या पारड्यात पडत असे. शिवाय पाटील यांचे स्वकर्तृत्व आहेत. शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळेस निवडून आले होते. त्यावेळी उमरगा विधानसभा मतदारसंघाचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात होता. पाटील कुटुंबीयांमुळे चाकूरकरांना उमरग्यातून मतांची आघाडी मिळत असे. त्यामुळे पक्षात वरपर्यंत त्यांचे नाव झाले. पाटील यांची पक्षनिष्ठा, कर्तृत्वाचे पक्षाने त्यांना सातत्याने फळ दिले आहे.

आता पक्षाला देण्याची पाटील यांची पाळी आहे. धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस कमकुमवत झाली आहे. सध्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. उमरगा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पाटील औसा मतदारसंघात गेले. त्यामुळे उमरगा मतदारसंघात काँग्रेस मागे पडली. बसवराज पाटील यांनी लक्ष घातले तर उमरग्यातून काँग्रेसचा आमदार निश्चितपणे निवडून येऊ शकतो, असे जाणकार सांगतात.

मतदारसंघातील प्रत्येक गावात पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे किमान आपल्या मतदारसंघात तरी त्यांना काँग्रेसचा आमदार निवडून आणावा लागणार आहे. दुसरीकडे यंदा त्यांच्या साखर कारखान्याने उसाचा बिलाचा दुसरा हप्ता अद्याप दिलेला नाही, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाला असून, लवकरच बिलांचे वाटप करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. यावर पाटील कसा मार्ग काढणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT