Beed Politics-EX Minister jaydatta Kshirsagar Active In Local Body Election Sarkarnama
मराठवाडा

Jaydatta Kshirsagar News : बीडमध्ये अजित पवारांनी घेरताच पुतण्याच्या मदतीसाठी काका जयदत्त क्षीरसागर मैदानात!

EX Minister Jaydatta Kshirsagar On Filed : बीड नगर पालिकेच्या निवडणुकीत गेवराईच्या पंडितांचा वाढता हस्तक्षेप पाहता जयदत्त क्षीरसागर यांनी गेवराईतील भाजपचे नेते बाळराजे पवार यांच्या निवासस्थानी भेट देत सूचक इशारा दिला होता.

Jagdish Pansare

  1. बीडमध्ये अजित पवारांनी आक्रमक मोर्चेबांधणी केल्यानंतर क्षीरसागर पुतण्याच्या समर्थनार्थ जयदत्त क्षीरसागर सक्रिय झाले.

  2. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मैदानात उतरल्याने स्थानिक राजकारणात स्फोटक वातावरण निर्माण.

  3. या संघर्षामुळे बीडमध्ये नवी राजकीय समीकरणे आणि पवार-क्षीरसागर संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता.

Beed Municipal Council Election : बीड नगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने प्रचारात रंगत आली असतानाच प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. बीड नगरपालिकेत गेली 35 वर्ष असलेल्या क्षीरसागर कुटुंबाच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील नेते एकवटले आहेत.

प्रचाराच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीड नगर पालिकेतील क्षीरसागरांची सत्ता आणि मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्धार बोलून दाखवला. शहरातील रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्याच्या प्रश्नावरून अजित पवारांनी क्षीरसागर कुटुंबांना घेरले. पाच वर्ष सत्ता माझ्या हातात द्या, जे 35 वर्षात झाले नाही ते करून दाखवतो, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधताना अजित पवार यांनी त्यांच्या एकाधिकारशाहीवर जाहीरपणे टीका केली. नगर पालिकेचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार आणि एबी फॉर्म आपल्याला देण्याची मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली होती. याची माहिती मला जिल्ह्यातील नेत्यांनी जेव्हा दिली तेव्हा मी त्याला स्पष्टपणे नकार दिला. तुम्ही पक्षाचे मालक झालात का? असं चालणार नाही, अशा स्पष्ट शब्दात त्यांना सुनावल्याचे पवारांनी सांगितले.

त्याला योगेश क्षीरसागर यांनी सगळे एबी फॉर्म आपण मागितले होते या आरोपाचे खंडन करत कार्यकारणीतील टोळक्याने अजित पवारांना चुकीची माहिती दिल्याचा पलटवार केला. एकूणच बीडची नगरपालिका खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने क्षीरसागर कुटुंबाला घेरण्याची पूर्ण तयारी केलेली असतानाच आता अडचणीत सापडलेले पुतणे योगेश क्षीरसागर यांच्या मदतीला काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर धावून आल्याचे दिसून आले आहे.

बीड नगर पालिकेच्या निवडणुकीत गेवराईच्या पंडितांचा वाढता हस्तक्षेप पाहता जयदत्त क्षीरसागर यांनी गेवराईतील भाजपचे नेते बाळराजे पवार यांच्या निवासस्थानी भेट देत सूचक इशारा दिला होता. त्यानंतर आता जयदत्त क्षीरसागर उघडपणे नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात उतरले आहेत. क्षीरसागर यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी पक्षाच्या प्रचारात ते सक्रिय झाल्याने बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

एकीकडे अजित पवार बीडमध्ये बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाचा पॅटर्न राबवण्याचे स्वप्न दाखवत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या माजीमंत्री आणि एका आमदारामुळे बीड जिल्ह्याची राज्यातच नाही तर देशभरात बदनामी झाल्याचा आरोप जयदत्त क्षीरसागर यांनी केला. बीड जिल्हा म्हणजे युद्धभूमी झाली आहे. कुणालाही जाती धर्मावर युद्ध खेळायचे असेल तर ते बीडमध्ये येतात. बीडची अवस्था बिहार पेक्षाही वाईट झाल्याचे सांगत जयदत्त क्षीरसागर यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जाते.

बीडचे आहे म्हणून दांम्पत्याची धिंड

निवडणूक प्रचार सभेत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी बीडची बदनामी कोणत्या थराला गेली आहे हे सांगताना बिहार मधील पाटणा शहरातील एक प्रसंग सांगितला. गंगा स्नानासाठी प्रयागराज मध्ये गेलेल्या आणि सध्या अनेक वर्षांपासून बिहारमध्येच स्थायिक असलेल्या एका मूळच्या बीडमधील दांपत्याला ते बीडचे आहेत हे समजतात त्यांची अक्षरशा धिंड काढण्यात आल्याचा दावा जयदत्त क्षीरसागर यांनी केला. बीडचे लोक वाईट आहेत, त्यांना इथून हाकलून द्या अशी मागणी तिथे उपस्थित काही जणांनी केली होती. एवढी वाईट प्रतिमा आपली देशभरात झाली आहे. ही पुसून काढायची असेल तर जातीचे राजकारण करणाऱ्यांना रोखावे लागेल असे, आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

5 FAQs (Marathi)

1. बीडमध्ये नेमका वाद कोणत्या मुद्द्यावरून उभा राहिला?
स्थानिक नेतृत्व आणि राजकीय प्रभावाबाबत संघर्ष तीव्र झाला.

2. जयदत्त क्षीरसागर कोणाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले?
ते त्यांच्या पुतण्याच्या बाजूने उभे राहिले आहेत.

3. अजित पवारांनी कोणती कारवाई केली?
स्थानिक संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.

4. या संघर्षाचा बीड राजकारणावर काय परिणाम?
नवी समीकरणे, तणाव वाढण्याची आणि गठबंधन बदलण्याची शक्यता.

5. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय आहे?
दोन्ही बाजूंमध्ये ध्रुवीकरण वाढत असून वातावरण तापलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT