Manoj Jarange Patil, Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election: शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जरांगे पुढे येत असतील तर..., शरद पवारांचं ऐन निवडणुकीत सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) जर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येत असतील, तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. बीडमध्ये (Beed) महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे असोत किंवा आणखी कोणी पुढे येत असेल, तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे (Rajesh Tope) जरांगे पाटलांना भेटलो. शिवाय यावेळी मी त्यांना एक विनंती केली की, राज्यातील सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेऊ, असं आपण जरांगेंशी बोलल्याचं पवारांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीडमध्ये महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी सोनवणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केलं. तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळासारखी अनेक संकटं असतील परंतु मनाने अतिशय दिलदार लोकांचा हा जिल्हा आहे. एकदा या जिल्ह्यामध्ये मी विनंती केली आणि विनंतीला मान देऊन जिल्ह्याने सर्वच्या सर्व आमदार आमच्या पक्षाचे निवडून दिले. आमदार सगळे आपले पण सत्ता दुसरीकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांचं दुखणं कमी कसं करायचं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना विजयी केलं

पुढे बोलताना पवार म्हणाले, मला केंद्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी बीडमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याची आज व्यासपीठावर बसल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाली. या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं. नाना पाटील सातारचे होते पण उभे बीड जिल्ह्यात राहिले. या जिल्ह्यातील जनतेने स्वातंत्र्यासाठी त्याग केला. मोठ्या नेत्याचा सन्मान केला. नाना पाटलांनी या जिल्ह्यात घोषणा केली होती. मात्र, सरकार बदल्यामुळे ती त्यांना पाळता आली नाही, असा किस्सा पवारांनी यावेळी सांगितला.

पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

या निवडणुकीत आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायचे आहे, त्याला नक्कीच पाडेल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. शिवाय उमेदवार होण्यापेक्षा उमेदवार पाडणारे बना, त्यात मोठा विजय आहे, असं सूचक वक्तव्यदेखील पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांचा रोष सत्ताधाऱ्यांवर आहे हे लपून राहिलं नव्हतं. अशातच ऐन निवडणुकीच्या काळात पवारांनी जरांगेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT