Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar : मोदी सरकारला शेतकऱ्यांचा हिसका काय आहे, हे दाखवून द्या, पवारांचे आवाहन !

Chaitanya Machale

Beed News : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांवर, महिलांवर, नोकरदारांवर तसेच गोरगरीबांवर अन्याय करण्याचेच काम केले आहे. शेतीला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र त्याची कोणतीही दखल केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आस्था या सरकारला कधीही वाटली नाही. शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मोदी सरकारला निवडणुकीच्या निमित्ताने धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे. शेतकऱ्यांचा हिसका काय आहे, हे दाखवून द्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी केले.

बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची शनिवारी सभा झाली. त्यामध्ये पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडक शब्दात टीका केली. पवार म्हणाले की, देशातील मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. देशाच्या पंतप्रधानांचे शेतकऱ्यांवर किती प्रेम आहे, हे आम्हाला कळाले आहे. शेतीच्या मालाला हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले. संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. आपले आणि देशाचे पोट भरण्यासाठी आपल्या शेतामध्ये शेतकरी कष्ट करतो, मेहनत करतो, घाम गाळतो, त्यांच्यासाठी मोदींनी काही केलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्याला हमीभाव मिळावा यासाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाना येथील हजारो शेतकरी आंदोलनासाठी बसले होते. शेतीमालाला भाव द्या, अशी त्यांची मागणी होती. हे शेतकरी दिल्लीत येऊ नये यासाठी शेकडो पोलिस, अधिकारी केंद्र सरकारने तैनात केले. यासाठी काय काय प्रकार केले, हे तुम्ही पाहिलेच आहे. शेतकऱ्यांचे (Farmer) हे आंदोलन एक वर्षे सुरू होते. शेतकरी उन्हातान्हात, थंडी वाऱ्यात बसले. पण त्यांची आस्था केंद्रातील मोदी सरकारला कधीही वाटली नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आता त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही. त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, त्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्याचा हिसका काय आहे, हे समजले पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

अतिशय दिलदार लोकांचा बीड (Beed) हा जिल्हा आहे.सगळे आमदार या जिल्ह्याने दिले. क्रांतीसिंह नाना पाटील यांना या जिल्ह्याने एकदा विजयी केले. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. मणिपुरमध्ये संघर्ष झाला. स्त्रीयांवर अत्याचार झाले. मुलींवर बलात्कार करण्यात आले. अशा घटना तेथे घटल्या. प्रधानमंत्र्यांनी तेथे जावे तेथील आयाबहिणींशी संवाद साधवा, जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी केली गेली. अनेक दिवस हे आंदोलन चालू असतानाही नरेंद्र मोदींना तेथे जावे वाटले नाही, यावरून त्यांची वृत्ती समजते. दिल्लीत अत्याचार केले. गुजरातमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले.

देशाच्या पंतप्रधानांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले. केवळ मोदींवर टीका केली म्हणून हे केले. सत्तेची गुर्मी आणि सत्तेचा गैरवापर हेच धोरण नरेंद्र मोदी सरकारचे आहे.देश एकसंघ ठेवायचा असेल तर सर्व धर्मीयांना एकत्र ठेवले पाहिजे. पण दुर्देवाने आज प्रधानमंत्री मुस्लीम समाजावर टीका करतात. त्यांच्या मनात द्वेष आहे.ते मुस्लीम समाजाला टार्गेट करतात. मोदींना मदत होईल, असे कोणतेही काम करणार नाही, असा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, असेही शरद पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT