Congress vs BJP : बीडमधील राजकीय गुन्हेगारीवरून संपूर्ण राज्यात गदारोळ सुरू आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रोज नवनवे धक्कादायक असे खुलासे होऊ लागले आहे. राजकीय गुन्हेगारीची पाळेमुळे एवढी खोलवर रूजली आहेत की, प्रशासनाला देखील वेठीस धरलं आहे.
बीडमधील राजकीय गुन्हेगारीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोजचा राजकीय संघर्ष उफाळताना दिसतोय. यातून सत्ताधाऱ्यांनी बीड एक प्रयोगशाळा केली असल्याची आता टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टायमिंग साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेसचे (Congress) हर्षवर्धन सपकाळ हे बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. बीडमधील राजकीय गुन्हेगारीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करताना, भारताच्या गणराज्यात बीड जिल्हा आहे की नाही, हाच एक प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे, असा टोला लगावला.
राज्य सरकारचा महाराष्ट्रासह बीड (BEED) जिल्ह्याविषयी वाईट कारभार सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठरवून घ्यावे की बीड हा महाराष्ट्राचाच भाग आहे का? बीडमधील कारागृहात टोळीयुद्ध भडकल्याचे बोलले जाते. प्रशासनान म्हणते, काहीच झालेले नाही. नेमकं काय चाललं आहे, हे समजायला मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 'उघडा डोळे बघा नीट', या वाक्प्रचाराचा अर्थ समजून घ्यावा, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनावले आहे.
बीड ही आता भाजपची एक प्रयोगशाळा झाली आहे. बीड सारखे प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रशासन उभे करायचे आहे.त्याची चाचपणी म्हणून देवेंद्र फडणवीस बीडकडे पाहत आहेत का? असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारला केला आहे.
संतोष देशमुख यांची हत्या नसून देशमुख हे शहीद झाले आहेत. त्यांच्या 'शहीद'वर कायदा काय काम करतोय, प्रशासन काय काम करते, गृह विभाग आहे का? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केले. बीडमधील परिस्थिती समोर आल्यानंतर एक आशा निर्माण झाली होती की, सगळ्या यंत्रणेना काम करावे. मात्र कायदा काम करत नसल्याचे बीड कारागृहातील घटनेने पुन्हा एकदा समोर आलं आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
नागपूरमधील नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावरून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "आता वर्ष दोन वर्षे असंच चालणार. हेच बघायला मिळणार आहे. कारण पैसा फेक तमाशा देख,हे भाजपचे तंत्र निवडणुकीच्या काळात पाहिले. विकासाला निधी हवा असेल तर आमच्याकडे या, हा नवीन खेळ सत्ताधाऱ्यांकडून खेळला जातोय. किंवा गुन्हे दाखल करून आपल्या पक्षाकडे वळवून घ्या, हा मुघलाई काळ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महाराष्ट्रात राबविला जातोय". मात्र हे फार जास्त काळ चालणार नाही. वर्ष दोन वर्षानंतर भाजपमध्ये गळती लागल्याचे आपल्याला दिसेल, असेही सपकाळ यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.