NCP Party ritual at Kankaleshwar Mahadev temple in Beed after election results. Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : बीडमध्ये राष्ट्रवादीचा नवस पूर्ण : भाजप अन् शरद पवारांच्या पक्षाचा पराभव होताच अजितदादांचा पक्ष कंकालेश्‍वर मंदिरात

Beed Politics : बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीने कंकालेश्वर महादेव मंदिरात 101 नारळांचे तोरण बांधून नवसपूर्ती करण्यात आली.

Datta Deshmukh

बीड : राजकीय नेत्यांकडून निवडणुकीत विजयासाठी प्रयत्नाला आणि कष्टाला फळ मिळावे यासाठी देव -देवतांची साधना, पुजा -अर्चा, अध्यात्मिक उपाय आणि विजयासाठी नवस केले जातात. असाच नवस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्‍वर चव्हाण यांनीही केला होता. आज पक्षाच्या गटनेता निवडीनंतर त्यांनी सर्वांनाच कंकालेश्‍वरकडे निघा, असे आवाहन केल्यानंतर पक्षातील नेत्यांना चव्हाणांनी केलेला नवस कळाला.

आमदार विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत येथील शहराचे ग्रामदैवत व प्रसिद्ध भगवान शिव कंकालेश्वर येथे 101 नारळाचे तोरण बांधून नवसपूर्ती करण्यात आली. यावेळी बीडचे निवडणुक निरीक्षक माजी आमदार संजय दौंड, नगरसेवक अमर नाईकवाडे, बाळासाहेब गुंजाळ, अनुप मंत्री, भागवत तावरे, पिंटू पवार, संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.

चार वर्षे रखडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच उरकल्या. पण ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली होती तेव्हा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली. पक्षाचे स्थानिक नेतृत्व करणाऱ्या योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मोठा पेच निर्माण झाला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हेच बीडचे पालमंत्री असल्याने सर्वांच्याच नजरा बीडकडे होत्या.

ऐनवेळी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा आली. पण, 26 प्रभागांत 52 उमेदवार, नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच काही ठिकाणी डमी उमेदवार शोधणे हे मोठे जिकरीचे आणि आव्हानाचे काम होते. पंडित यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण, निरीक्षक माजी आमदार संजय दौंड, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी अमर नाईकवाडे, फारुक पटेल, शेख निझाम, विनोद मुळूक यांच्या मदतीने उमेदवार शोध आणि निवडीची प्रक्रिया पार पडली.

पंडित यांच्या आवाहनाला शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे, शिवसेनेचे अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर यांनीही साथ दिली. पण, 35 वर्षांपासून नगर पालिकेवर सत्ता असलेले डॉ. क्षीरसागर निघून गेल्याची पोकळी आणि मित्रपक्ष भाजपकडूनही हिंदुत्वाचा प्रयोग अशा दुहेरी आव्हानांचा सामना राष्ट्रवादीसमोर होता. पण, अजित पवारांचे शहर विकासाचा शब्द आणि स्थानिक नेत्यांच्या प्रचारामुळे निकालानंतर ही आव्हाने पक्षाने लिलया पार करत नगर पालिकेवर झेंडा फडकविला.

शहरातील सर्वच घटकांनी साथ दिल्याने प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 19 आणि सोबत असलेल्या शिवसेनेचे तीन नगरसेवक विजयी झाले. आज मंगळवारी पक्षाच्या नगरसेवकांसह शिवसेना, एमआयएम, काँग्रेसच्या नगरसेवकांची शिव-शाहू-फुले-आंबेडकर शहर विकास या गटाचीही स्थापना झाली. या गटाच्या अध्यक्षपदी फारुक पटेल यांच्या निवडीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले.

पण, पक्षाचे सर्व नेते जिल्हाधिकारी कार्यालयातून पंडितांच्या शिवछत्रवर पोचताच जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्‍वर चव्हाण यांनी कंकालेश्‍वरला येण्याचे आवाहन केले. अचानक का? असे पंडितांनी विचारल्यानंतर आपण बीडच्या विजयासाठी कंकालेश्‍वर महादेवाला साकडे घातले होते. आता 101 नारळाचे तोरण बांधून हा नवस पूर्ण करायचा असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यानंतर नेत्यांच्या वाहनांचा जत्था कंकालेश्‍वरला पोचला आणि पुजाऱ्यांच्या हस्ते पुजा - आरती करुन नवसपुर्ती करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT