Yogesh Kshirsagar - MLA Sandip Kshirsagar Politics In Beed News Sarkarnama
मराठवाडा

Sandip Kshirsagar : संदीप-योगेश या क्षीरसागर बंधूंनी श्रेय घेतलेले शंभर कोटी गेले कुठे? बीडमधील रस्त्यांचा प्रश्न गंभीर!

Beed Municipal Council Election 2026 : तीस वर्षांपासून नगर पालिकेवर क्षीरसागरांची सत्ता आणि बीडची आमदारकीही त्यांच्याच घरात आहे. बदल एवढा झाला की एकाचे दोन क्षीरसागर झाले.

Jagdish Pansare

  1. बीडमधील पालकमंत्र्यांच्या बैठकीत न आलेल्या शंभर कोटी निधीचं श्रेय क्षीरसागर बंधूंनी घेतल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत आहे.

  2. निधीचा पत्ता नाही, रस्त्यांची कामं थांबली, आणि श्रेय मात्र क्षीरसागर गटाकडे गेलं असल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे.

  3. बीडकरांचा सवाल – ‘निधी आला कुठे?’ असा चर्चेचा विषय संपूर्ण जिल्ह्यात रंगला आहे.

दत्ता देशमुख

Beed Politics News : बीड जिल्ह्यातील राजकारणाची व येथील घडामोडींची चर्चा राज्य पातळीवर होते. राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा हा जिल्हा विविध कारणांनी कायम प्रकाशझोतात असतो. त्या निवडणुका म्हटल्या की जिल्ह्यातील भाऊबंदकी, काका-पुतण्यांचे राजकारण जरा अधिकच डोके वर काढते. नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे पुन्हा जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. बीडमध्ये रस्ते, पाणी, वीजेचा प्रश्न गंभीर आहे. वर्षानुवर्षे लोक यासाठी ओरड करतात, राजकीय नेते निधी आणल्याचे श्रेय लाटतात, पण समस्या काही संपत नाहीत.

काही दिवसापुर्वी शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री अजित पवारांसोबतच्या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. त्यावर 'बघतो'एवढेच उत्तर पवारांनी दिले. पण जणू हा निधी मिळाला अशा थाटात तो आणल्याचे श्रेय घेण्यासाठी संदीप क्षीरसागर आणि त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांच्यात स्पर्धा लागली होती. प्रत्यक्षात ज्या रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला होता, ते रस्ते मरणासन्न अवस्थेत आहेत. मग ज्या 100 कोटी रुपये आणल्याचे श्रेय क्षीरसागर बंधू लाटत होते, ते पैसे गेले कुठे? असा प्रश्न बीडकर विचारू लागले आहेत.

मंजूर झालेली आणि काम सुरु होत असलेली प्रत्येक गोष्टी 'आम्हीच'हा श्रेयवाद आणि लवकरच मंजूरी मिळवून बीडकरांचा प्रश्‍न सोडवू, अशा घोषणा बीडकरांना परवलीच्या झाल्या आहेत. असेच पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीचा मुद्दा आला आणि पवारांनी फक्त 'बघतो' असा शब्दोच्चार केला. झालं त्यानंतर आमदार संदीप व योगेश या क्षीरसागर बंधूंनी 'आम्हीच 100 कोटी रुपये आणले'अशी दवंडी पिटली. मात्र, दोन महिन्यांपूर्वी पिटलेल्या दवंडीचे 100 कोटी गेले कुठे, असा सवाल बीडकर विचारत आहेत.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बीड नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात पक्षांतर्गत वाद, एकमेकांवर आरोप आणि श्रेयवाद यासाठी नेत्यांनी हत्यारे परजली आहेत. मात्र, शहरातील उखडलेले रस्ते, रस्त्यावरील जनावरे, धुळ, खड्डे, बंद पथदिवे, तुंबलेल्या नाल्या, पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण या मुलभूत समस्यांनी बीडकर त्रस्त आहेत. सहाजिकच प्रत्यक्ष मतदान मागायला आल्यानंतर या मुद्द्यांवर सजग नागरिक जाबही विचारतील. पण, लोकांच्या विचारण्यापेक्षा आता नेत्यांनीही खरोखर काय केले याचेही आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. धरणे तुडूंब भरलेली असताना बीडकरांना पाण्यासाठी महिनाभर वाट पहावी लागलेली आहे.

या आणि अशा अनेक अपयशांचा बाप कोण? याचे उत्तर बीडकरांसह क्षीरसागर विरोधक विचारल्याशिवाय राहणार नाहीत. तीस वर्षांपासून नगर पालिकेवर क्षीरसागरांची सत्ता आणि बीडची आमदारकीही त्यांच्याच घरात आहे. बदल एवढा झाला की एकाचे दोन क्षीरसागर झाले. नऊ वर्षांपूर्वी संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान देत स्वतंत्र चुल मांडली. तर, तीन वर्षांपासून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा राजकीय वारसा घेत योगेश क्षीरसागर रिंगणात आहेत.

कथीत शंभर कोटी अन् रस्त्यांचे बेहाल

मागच्या निवडणुकीपेक्षा बीड शहरात तब्बल 54 हजार मतदरांची वाढ झाली आहे. त्यावरुन शहराचा विस्तार किती झपाट्याने होतोय हे सहज लक्षात येईल. शहराच्या विस्तारीत भागात वसाहती झपाट्याने वाढत आहेत. मातीच्या रस्त्यांवर पावसाळ्यात चिखल असल्याने वाहने चालविणे तर दुरच पण चालणेही दुरापास्त अशी गत आहे. नाळवंडी नाका, बार्शी नाका या भागातील चित्र तर भयावह आहे. याहून शरमेची बाब म्हणजे शहरातील बाजारापेठा आणि कायम वर्दळीच्या रस्त्यांचे बेहाल आहेत.

यात उदाहरणे म्हणजे राजूरीवेस ते बलभीम चौक रस्ता, सुभाष रोड चौक ते सिद्धीविनाक संकुल व जिल्हा क्रिडांगणापासून जालना रोडवर जाणारा रस्ता आणि जिल्हा परिषद ते नगर पालिकेचा रस्त्यावरुन चालताना नागरिकांकडून संताप व्यक्त होतो. तीनही रस्ते कायम वर्दळीचे, बाजारपेठा असलेले आहेत. मागच्या पाच वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे, खड्यातील खडी आणि धुळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पण, यावर मार्ग निघालाच नाही. मधल्या काळात मात्र 'शंभर कोटी रुपये माझ्यामुळे मंजूर' अशी आवई क्षीरसागर बंधूंनी उठवली. पण, हा निधी गेला कुठे, मंजूरीचे पत्र कुठे? असा सवाल आता विचारला जात आहे.

FAQs

1. शंभर कोटींचा निधी बीडमध्ये खरोखर आला का?
➡️ नाही, पालकमंत्र्यांच्या बैठकीत तो निधी अद्याप मंजूर झालाच नाही, अशी माहिती आहे.

2. क्षीरसागर बंधूंनी काय दावा केला?
➡️ त्यांनी बीडसाठी शंभर कोटी निधी मंजूर झाल्याचं सांगून त्याचं श्रेय स्वतःकडे घेतलं.

3. प्रत्यक्षात रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत का?
➡️ नाही, सध्या कोणतीही मोठी कामं सुरू नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

4. बीडकरांची या प्रकरणावर काय प्रतिक्रिया आहे?
➡️ नागरिकांमध्ये संताप असून ते ‘श्रेयखोरी राजकारणा’वर टीका करत आहेत.

5. सरकार किंवा पालकमंत्री यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली आहे का?
➡️ अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र प्रशासकीय स्तरावर चौकशीची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT