Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींशी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांचा संबंध असल्याचा आरोप आहे. विलास घुलेंची हत्या झाल्यानंतर आरोपींना पळून जाण्यासाठी सौरभ सोनवणे यांनी मदत केली, आपली थार गाडी दिली असा आरोप घुले कुटुंबियांसह ग्रामस्थांनी केला आहे. पोलीसांनी सौरभ सोनवणे याचे नाव सहआरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंदवले असले तरी पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घुले कुटुंबियांचा आरोप आहे.
सौरभ सोनवणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी केजमध्ये मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विलास घुले यांची पत्नी, नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. एसआयटीचे पथक सौरभ सोनवणे यांच्या केज येथील 'पवनसुत' बंगल्यावरही पोहचले होते. चार तास चौकशी झाल्यानंतरही सोनवणे यांच्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने घुले कुटुंबीय आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तर विलास घुले हत्या प्रकरणाचे माझ्या विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप करत खासदार बजरंग सोनवणे यांनी आपण कुठल्याही चौकशीला समोर जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
बीड तालुक्यातील कदमवाडी येथे १९ जून रोजी झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर कारवाईची मागणी करत मोर्चा आणि आंदोलनाची हाक दिली होती. त्यानूसार केजमध्ये आज सौरभ सोनवणे यांच्या अटकेची मागणी करत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. १९ जून २०२६ रोजी बीड तालुक्यातील कदमवाडी जवळ वादात मध्यस्थी करायला गेलेल्या विलास घुले यांची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली आहे. मात्र दहावा आरोपी अद्याप फरार आहे. मुख्य आरोपीला अटक न झाल्याने पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. या प्रकरणात मुंडे यांनी विधीमंडळातही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याची मागणी केली होती. सौरव सोनवणे हे खासदाराचे चिरंजीव असल्याने त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. आरोपींवर कारवाईला उशीर झाला तर पुरावे नष्ट केले जातील, असा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, विलास घुले यांच्या कुटुंबीयांना भेटून आमदार धनंजय मुंडे यांनी कैज येथे पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यात न्यायासाठी मोर्चा आणि आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. पूरक तक्रारीत नाव असलेल्या सौरव सोनवणे यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करावी, फरार असलेल्या दहाव्या आरोपीला तात्काळ अटक करावी, SIT मार्फत पारदर्शक तपास करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. विलास घुले यांच्या हत्या प्रकरणानंतर पुन्हा एका बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यात तब्बल २२ हत्या झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.