Bhawana Gawali and  Hemant Patil
Bhawana Gawali and Hemant Patil Sarkarnama
मराठवाडा

Bhavana Gawali and Hemant Patil : भावना गवळींचे पुनर्वसन, पण मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर हिंगोलीची जागा सोडणारे हेमंत पाटील वाऱ्यावर?

Jagdish Pansare

Hingol Lok Sabha Constituency : यंदा लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मराठवाडा आणि महाराष्ट्रात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून आले. यामध्ये महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही धक्कादायक निर्णयही घ्यावे लागल्याचे समोर आले. जसे की भाजपच्या दबावामुळे लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करणे.

2019 मध्ये युतीकडून निवडून आलेल्या हेमंत पाटलांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. पण जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ आली तसा हेमंत पाटील यांना मतदारसंघात भाजपचा विरोध वाढू लागला.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आधी भाजपचा विरोध झुगारत हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, पण महायुती असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात अर्ज भरले, उमेदवार बदला म्हणून बैठका घेतल्या, पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवली. या सगळ्याचा परिणाम हेमंत पाटील यांनी जाहीर झालेली उमेदवारी बदलण्यात झाला.

हक्काचा हिंगोली मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर हेमंत पाटील(Hemant Patil) यांनी सोडला. बदल्यात वाशिम मतदारसंघातून पत्नीला उमेदवारी मिळवून दिली. तिकडे वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापल्याने त्या नाराज झाल्या. त्यांनी पक्षाच्या विरोधात उभे ठाकण्याची भूमिका घेतली. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द देत भावना गवळी यांना राजश्री पाटील यांचे काम करायला लावले.

पण यानंतरही वाशिममधून राजश्री पाटील यांचा तर हिंगोलीत हेमंत पाटील यांच्याऐवजी दिलेल्या बाबुराव कदम यांचा पराभव झाला. शिंदे गटासाठी जसा हा मोठा धक्का होता, त्याहीपेक्षा भावना गवळी(Bhavana Gawali) आणि हेमंत पाटील यांच्यासाठी तो अधिक होता. आता विधानपरिषद निवडणुकीतील रिक्त 11जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी महायुती-महाविकास आघाडीने आपापल्या संख्याबळानुसार उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपने लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देत त्यांचे पुनर्वसन केले. वाशिममध्ये उमेदवारी गमावलेल्या माजी खासदार भावना गवळी यांना दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्र्यांनी त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. पण हेमंत पाटील यांचे पुढे काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

हिंगोलीत हेमंत पाटील स्वतः उमेदवार असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते, असे आता बोलले जात आहे. पण त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिममधून उमदेवारी दिली गेली. कदाचित हेमंत पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे पुनर्वसनाच्या यादीत त्यांचे नाव मागे पडले असावे, अशी चर्चा आहे. पण दोन्ही बाजूंनी विचार केला, तर नुकसान हेमंत पाटील यांचेच झाले.

हिंगोली मतदारसंघ सोडावा लागल्याने वाशिमच्या मतदारांनी बाहेरचा उमेदवार लादला म्हणून राजश्री पाटील यांना पराभूत केले. भावना गवळी यांची हक्काची खासदारकी गेली. राजश्री पाटील निवडून आल्या असत्या तर हेमंत पाटील यांना थांबवता आले असते. पण वाशिममधून त्यांचाही पराभव झाला, यामुळे हेमंत पाटील यांची अवस्था सध्या तेलही गेले, तुपही गेले, हाती राहिले धुपाटणे अशी झाली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT