Bhumre-Sattar-Save-Danve News Aurangabad
Bhumre-Sattar-Save-Danve News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad साठी मोठा दिवस : तीन कॅबिनेट मंत्री आणि दानवेंनाही कॅबिनेट दर्जा!

जगदीश पानसरे

औरंगाबाद : जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यादांच एकाच ठिकाणचे तीन कॅबिनेट मंत्री होण्याचा प्रकार घडला आहे. (Aurangabad) ठाकरे सरकारमध्ये जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळाले होते. शिंदेंच्या बंडानंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये यात वाढ झाली आहे. भाजपकडून (Atul Save) सावे आणि शिंदेंकडून भुमरे, सत्तार अशा तिघांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.

तर तिकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आमदार अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवत त्यांनाही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळवून दिला आहे. औरंगाबादसाठी खऱ्या अर्थाने आजचा दिवस मोठा म्हणावा लागेल (Marathwada)औरंगाबादच्या राजकीय इतिहासात कधी नव्हे ते एवढे महत्व या जिल्ह्याला मिळत आहे.

राज्य व देशातील राजकीय घडमोडींचे पडसाद आणि केंद्रबिंदू आता मराठवाड्यातील लातूर, नांदेड, बीड शहरांकडून औरंगाबाद होऊ पाहत आहे. यापुर्वी जिल्ह्याला राज्यमंत्रीमंडळात मर्यादित स्थान दिले जायचे. केंद्रात तर पहिल्यांदा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले. मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपचे रावसाहेब दानवे, डाॅ. भागवत कराड यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.

त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक-दोन नाही तर चक्क तीन कॅबिनेट मंत्री जिल्ह्याला मिळाले आहेत. २०१९ मध्ये युतीमध्ये लढलेल्या पण मुख्यमंत्रीपदावरून वेगळे झालेल्या शिवसेना-भाजपमधील दुरावा आणि वादातून अनेकांचे नशीब फळफळले. काहीजणांनी तर दोन्ही डगरीवर हात ठेवत आपला स्वार्थ साधून घेतला. त्यापैकीच शिंदे गटाचे भुमरे आणि सत्तार हे दोन नेते म्हणावे लागतील.

ठाकरे सरकारमध्ये संदीपान भुमरे हे रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री होते, तर अब्दुल सत्तार हे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री होते. शिंदे बंडानंतर या दोघांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळाली, भुमरे कॅबिनेटमध्ये कायम राहिले तर सत्तारांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेटवर बढती मिळाली. भाजपने पुर्वचे आमदार अतुल सावे यांना आधीच्या राज्यमंत्रीपदावरून आता कॅबिनेटवर बढती दिली आहे.

फडणवीस सरकारमध्ये सावे यांना चार महिन्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे त्यांना नव्याने काम करण्याची संधी फडणवीसांनी या सरकारमध्ये देखील दिली आहे. तर तिकडे ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर आणि शिवसेनेला मोठे सुरुंग लागल्यानंतर पक्ष वाचवण्याच्या लढाईत एकनिष्ठ आणि खंबीर राहिलेल्या नेत्यांनाही मोठी संधी मिळत आहे.

विधान परिषदेचे आमदार, जिल्हाप्रमुख आणि राज्य प्रवक्ते असलेल्या अंबादास दानवे यांच्यावर ठाकरेंनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे यांनी दानवेंच्या नावाची शिफारस केली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असल्यामुळे दानवे यांची निवड ही देखील औरंगाबादच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT