Mumbai News: देशभरातील 37 आणि महाराष्ट्रातील 7 राज्यसभेच्या जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वाढल्याचं दिसून येत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार, महायुती सहा तर महाविकास आघाडीकडून एक खासदार राज्यसभेत निवडून जाणार आहे. त्यात भाजपच्या वाट्याला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी विनोद तावडेंसह अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहे. पण आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
महाराष्ट्र भाजपकडून राज्यसभेसाठी चार जणांची नावं फायनल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे. याचदरम्यान, पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधताना नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. त्यांनी ‘राज्यसभेसाठी प्रीतम मुंडेंचं नावही चर्चेत असून बाकी निर्णय पक्षाचे नेते घेतील’, असं म्हटलं आहे.
भाजपची राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी मुंबईत कोअर कमिटीची बैठक मंगळवारी (ता.24 फेब्रुवारी) पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,पंकजा मुंडे यांसह अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होते. या बैठकीत ज्या नावांवर चर्चा झाली त्यात माजी खासदार आणि लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत ऐनवेळी तिकीट कापलेल्या प्रीतम मुंडे यांच्या नावाचाही समावेश असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यसभेसाठी अनेक नावे चर्चेत असून त्यापैकी एक नाव प्रीतम मुंडेंचंही आहे. कारण त्या देखील या आधी खासदार होत्या. पण यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मी लोकसभा लढवली होती. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी पक्षाचं काम केलं, तसेच त्यांनी खासदार म्हणून देखील काम केल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
प्रीतम मुंडे यांच्या नावाबरोबरच आणखी काही नावं देखील चर्चेत आहेत. त्यामुळे आता बाकी निर्णय आमच्या पक्षाचे सर्व नेते घेतील अशी आमची अपेक्षा आहे, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांनी आधीच जोरदार रस्सीखेच सुरू असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणला आहे.यामुळे प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन भाजप राज्यसभेवर करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भाजपकडून राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुमारे 10 ते 12 संभाव्य नावांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आले. या बैठकीत काही प्रमुख नेत्यांच्या नावांवर फक्त चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठीचा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे,भागवत कराड, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली. बैठकीत काही इतर नावांचाही विचार करण्यात आला. पण भाजप पर्याय निवडताना अनुभव, पक्षनिष्ठा,सक्रियता यांसह विविध मुद्द्यांचा विचार केला जात आहे.
याचदरम्यान, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लवकरच पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचीही भेट घेण्याची दाट शक्यता आहे. या दोन प्रमुख नेत्यांमधील चर्चेनंतरच भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्यसभेच्या उमेदवारीबाबतच्या अंतिम नावावर निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.