Gopinath Munde
Gopinath Munde  Sarkarnama
मराठवाडा

Gopinath Munde News : भाजपचे धुरंधर नेते गोपीनाथ मुंडेंना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत फुटला होता घाम

सरकारनामा ब्युरो

Bjp Politics News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2009 पूर्वी प्रत्येक वेळी विधानसभा निवडणूक लढली होती. विशेषतः ते रेणापूर या मतदारसंघातून निवडणूक लढवत. या मतदारसंघातील थोडी गावे हे लातूर जिल्हातील होती तर थोडी गावे बीड मतदारसंघातील होती. त्यामुळे त्यांना दोन्ही जिल्ह्याशी संपर्क ठेवावा लागत होता. 2004 सालाची परळी मतदारसंघातील निवडणूक वगळता त्यांनी बीड जिल्ह्यातून निवडणूक लढली नव्हती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निम्मिताने आव्हानांचा डोंगर असतानाही त्यांनी हे आव्हान लीलया पेलत विरोधकांना चारी मुंड्या चित केले होते.

भाजपला (Bjp) त्याकाळी बहुजन समाजात रुजवण्यात सर्वात मोठा वाटा गोपीनाथ मुंडे यांचा आहे. गोपीनाथ मुंडे यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. सतत केलेला संघर्ष आणि कष्टाच्या बळावर त्यांना लोकनेता होण्यापर्यंत मजल मारता आली होती.

बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे म्हणतील तीच पूर्व दिशा असायची, म्हणजे बीड जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व त्यांच्याकडं आलं होतं. दोनवेळा त्यांनी भाजपचं प्रदेशाध्यपद भूषवले होते. याच काळाच भाजप चौकट तोडून बहुजनांमध्ये, वंचितांमध्ये रुजवला होता. 2006 साली केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांचे मोठे नुकसान झाले. पक्षाची सर्वच जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. (Gopinath Munde News)

त्यामुळे त्यांनी 2009 ची लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व तयारी सुरु केली. त्यावेळी त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) व काँग्रेसने त्याकाळी राज्य मंत्रीमंडळात मंत्री असलेल्या सुरेश धस यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी असलेले संबंध कामी आले होते.

मराठा व ओबीसी समाजातील नेत्यांनी त्यांना आतमधून निवडणुकीत मदत केली होती. त्यावेळेस त्यांच्यासोबत धनंजय मुंडे हे होते. त्यामुळे बजरंग सोनावणे यांनी सुद्धा त्यावेळी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा प्रचार केला होता. मुंडे यांनी सर्वच पक्षातील नेतेमंडळीसोबतचे संबंध शेवट्पर्यंत जपले होते. त्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना झाला.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले. त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा गळाला लागले. ऐन 2011 च्या नगरपरिषद निवडणुकीनंतर त्यांनी परळी येथील नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळेस त्यांच्यासोबत बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मधल्या काळात राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचं महत्व कमी करण्याचा, त्यांना बाजूला सारून केंद्रात पाठवण्याचं षडयंत्र आखण्यात आले होते, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती. त्यामुळेच मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती, असे सांगितले जातं. ऐनवेळी सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवानी यांनी मध्यस्थी करून गोपीनाथ मुंडे यांची नाराजी दूर केली होती. त्यामुळे त्यांनी इतर पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय बदलला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात रमेश आडसकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. ही लढत ही त्यावेळेस चुरशीची झाली. विशेषतः त्यावेळेस धनंजय मुंडे (Dhanjay Munde) व बजरंग सोनावणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, या निवडणुकीत देखील गोपीनाथ मुंडे यांनी विजय मिळवला. त्यानंतर मोदी सरकार सत्तेत आले. त्यावेळी पहिल्याच टप्प्यात गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय ग्रामविकासमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, नियतीला हे मान्य नसावे असा प्रकार घडला शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठ दिवसातच त्यांचे दिल्ल्लीत अपघाती निधन झाले.

SCROLL FOR NEXT