Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : विकासकामांवर मत मिळते यावर आता विश्वास राहिला नाही..

Jagdish Pansare

राम काळगे

BJP Marathwada Political News : `सब का साथ सबका विकास` चा दावा करत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तारुढ झाले आहे. भाजप अजूनही विकासकामांचे दाखले देतच निवडणुकांना सामोरे जात आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात भाजपची झालेली पिछेहाट पाहता त्यांच्या नेत्यांचा विकासकामावर मते मिळतात यावर विश्वास राहिलेला नाही.

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी लातूर जिल्ह्यातील शिरुरअनंतपाळ येथील एका कार्यक्रमात तसा दावा केला आहे. मी रेल्वे राज्यमंत्री असताना राज्यासाठी हजारो कोटींचा निधी आणला, विकासकामे केली. पण विकासावर मत मिळते यावर आता भरोसा राहिला नाही, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत भाजपने मिशन-45 चे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते.

हे मिशन राज्यातील महायुती व केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप गाठू पाहत होते. परंतु राज्यातील राजकीय घडामोडी, मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महायुतीच्या विरोधात गेला आणि भाजपचे मिशन फेल झाले. राज्याप्रमाणे मराठवाड्यातही महायुतीला मोठा फटका बसला. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे विद्यमान खासदार पराभूत झाले. लोकसभेच्या आठ पैकी केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभा या मतदारसंघात महायुतीला यश मिळाले. ही जागा शिवसेनेने जिंकली होती.

हा पराभव विसरत भाजपने (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माजी रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पक्षाने विधानसभा संयोजक पदाची जबाबदारी सोपवली आहे. काल (ता.31) लातूर जिल्ह्यातील शिरुरअनंतपाळ येथे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान यात्रेत रावसाहेब दानवे सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दानवे यांनी सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची आठवण करुन दिली.

महायुती सरकारने सुरु केलेल्या `मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना` बंद होणार असा अपप्रचार महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मी ठणकावून सांगतो मायचा लाल जरी आला तरी `लाडकी बहीण योजना` बंद होणार नाही, असे दानवे यांनी ठणकावून सांगितले. मी रेल्वेमंत्री असताना राज्यभर विकासकामासाठी हजारो कोटीचा निधी दिला.

परंतु मत विकासावर पडते यावर माझा तर भरोसाच राहिला नाही. रेल्वेमंत्री असताना हजारो कोटी दिले, सहा हजार कोटी रूपयाचे रस्ते दिले, एवढं करूनही पराभव झाला. त्याचे कारण मला अजूनही सापडले नाही, अशी खंत दानवे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. संभाजीराव जशी तुम्ही जनसन्मान पदयात्रा काढली, तशी आता मलाही यात्रा काढावी लागणार आहे.आम्ही सालदारासारख काम करतो, आम्ही मागतो काय मताची फुली, असे म्हणत दानवे यांनी मिश्किल टोलाही लगावला. काम करणाऱ्याला संधी दिली पाहीजे.

इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा नारा दिला, आजपर्यंत चार पिढ्या गेल्या पण गरिबी हटली का ? असा सवाल करत दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिब कुटूंबातून आले आणि पंतप्रधान झाले. गरिबीची त्यांना जाण आहे म्हणूनच त्यांनी 2011 च्या जनगणने प्रमाणे 125 कोटी लोकसंख्या आहे त्यापैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिले. गॅस, पीकविमा, शेतकऱ्यांना सन्मान निधी, महीलांसाठी शौचालय अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, याचा पुनरुच्चार करत त्यांनी विरोधकांच्या दाव्यावर हल्ला चढवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT