J.p.Naddas Aurangabad Rally News
J.p.Naddas Aurangabad Rally News Sarkarnama
मराठवाडा

Bjp News : कराडांचं असं झालं ; करायला गेले शक्तीप्रदर्शन झाली फटफजिती..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : भाजपच्या मिशन लोकसभेचा मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत फज्जा उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची अनुपस्थिती, स्थानिक नेत्यांमधील समन्यवयाचा अभाव आणि नेत्यांची रटाळ आणि लांबलेली भाषणं यामुळे लोक सभा सोडून निघून गेले. या फ्लाॅप सभेचे पडसाद नजीकच्या काळात पक्ष पातळीवर उमटल्याशिवाय राहणार नाहीत.

सभा फ्लाॅप गेली म्हणून (Bjp) भाजपचे नेते चिंतेत आहेत, तर विरोधक मात्र यावरून भाजपची खिल्ली उडवतांना दिसत आहे. आता या फ्लाॅप सभेचे मानकरी कोण? तर लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असलेले विद्यमान राज्यसभा खासदार तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) व त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन हे असल्याचे बोलले जाते. भाजपच्या मिशन लोकसभा यासाठीच्या जाहीर सभेचे नियोजन कराड पिता-पुत्रांनी आपल्या हाती घेतले होते.

शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर व इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना कराडांना या नियोजनापासून दूर ठेवले होते, त्यामुळे सभेला अपेक्षित गर्दी जमू शकली नसल्याची चर्चा आहे. शिरीष बोराळकर हे नुकतेच शहर-जिल्हाध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे या निमित्ताने आपली क्षमता दाखवण्याची संधी त्यांना होती, पण कराडांनी ती हिरावून घेतली. तर संजय केणेकर यांनी शहर-जिल्हाध्यक्षपदाच्या काळात अनेक आंदोलने करत भाजपला उर्जितावस्था प्राप्त करून दिली होती.

त्यामुळे आंदोलन, सभांना गर्दी जमवण्याची कला त्यांना चांगली अवगत होती. पण या दोघांना बाजूला ठेवत कराड पिता पुत्रांनी हे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आणि सभा तिथेच फसली. शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातून लोकांना आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र दुपारी चार वाजेपासून या लोकांना मैदानात आणू बसवल्यामुळे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षांचे मुख्य भाषण सुरू झाले तेव्हा वैतागलेले लोक, महिला सभा सोडून निघून गेल्या.

त्यामुळे कराडांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली. एकंदरित कराडांना अगदी कमी वेळात राजकारणात मोठी उंची गाठता आली असली तरी संघटनात्मक कामे आणि सभा यशस्वी करण्यात मात्र ते सपशेल अपयशी ठरले आहेत. याचे दुरगामी परिणाम डाॅ. कराड व त्यांच्या हर्षवर्धन या मुलावर होतांना दिसले तर नवल वाटायला नको. एव्हाना नड्डांच्या फ्लाॅप सभेची कारणे शोधण्यास वरिष्ठांनी सुरूवात देखील केली असले.

परंतु लोकसभा निवडणुकीच्या तयारीची सभा अशी वातावरण निर्मिती भाजपकडून करण्यात आली होती. त्यामुळे लोकसभा जिंकण्याचे स्वप्न घेवून निघालेल्या भाजपला साधी सभा देखील जिंकता आली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जगातील सर्वात मोठा आणि सदस्य असलेला, मॅनेजमेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपला २५ हजारांची गर्दी देखील राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेला जमवता येवू नये, यावरून भाजपची औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात किती ताकद आहे हे दाखवण्यास पुरेसे आहे. यापुढे भाजपचे राज्यपातळीवरील नेते अशा नियोजनात लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT