Nanded BJP News Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP Politics : नांदेड लोकसभेची जागा राखण्याचे भाजपसमोर आव्हान, येणार काळ कसोटीचा..

Jagdish Pansare

Marathwada Political News : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस हा मोठा भाऊ तर त्यानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा क्रम लागतो. जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने अलीकडच्या काळात जम बसवला आहे. (BJP News) भाजपचे तीन निवडून आलेले आणि एक विधान परिषदेचा असे चार आमदार नांदेड जिल्ह्यात आहेत, तर प्रताप पाटील चिखलीकर हे २०१९ मध्ये लोकभेवर निवडून गेले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच खूप मोठे यश मिळाले, जे यापूर्वी कधीच मिळाले नव्हते. (Nanded) हे यश येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत टिकून ठेवणे भाजपसाठी मोठे आव्हान असणार आहे. (Marathwada) जिल्ह्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षांत अनेक घटना, घडामोडी घडल्या आहेत. भाजपसाठी येणारा काळ हा कसोटीचा ठरणार आहे.

नांदेड लोकसभेची जागा महायुतीत भाजपकडे राहणार आहे. विद्यमान खासदार असल्यामुळे या जागेवर युतीतले शिंदे गट किंवा राष्ट्रवादी दावा सांगण्याची तशीही शक्यता नाही. (Pratap Patil Chikhlikar) भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याची राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणूक जेमतेम सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागले.

भाजपने संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू केली असून, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी निवडले आहेत. भाजपचा जिल्ह्यातील राजकीय इतिहास पाहता काही मोजक्याच निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आले आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत दोन खासदार व चार आमदार हीच भाजपची कामगिरी. किनवट विधानसभा मतदारसंघातून डी. बी. पाटील निवडून आले व युतीच्या काळात राज्यमंत्री झाले.

त्यानंतर ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून २००४ मध्ये निवडून गेले. त्यांच्या रूपाने भाजपला पहिला खासदार मिळाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर निवडून आले. देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाल्यानंतर राज्यातील राजकारणही बदलले. नांदेड जिल्ह्यातदेखील हा बदल घडलेला दिसला.

भीमराव केराम- किनवट, डॉ. तुषार राठोड-मुखेड, राजेश पवार-नायगांवमधून विधानसभेवर निवडून गेले, तर २०१४ मध्ये मुखेडमधून दिवंगत गोविंदराव राठोड हे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. या पोटनिवडणुकीत डॉ. तुषार राठोड विजयी झाले होते. काॅंग्रेसमधून भाजपत गेलेल्या माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी अशोक चव्हाण यांच्या आग्रहाखातर घरवापसी केली. त्यामुळे काही मतदारसंघात भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या विजयात या दोघांचा मोठा वाटा होता.

कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात चिखलीकर यांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. या दोघांमधील वाद सध्या विकोपाला गेला आहे. याचा फटका प्रतापराव पाटील चिखलीकर यांना येणाऱ्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. आगामी काळात भारतीय जनता पक्षाला शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. या दोन्ही पक्षांचा काही भागात प्रभाव आहे. जिल्ह्याचे महायुतीचे सर्व सूत्र भारतीय जनता पक्षाकडे राहणार असल्याने एक मोठी जबाबदारी पार पाडत जिल्ह्यातील राजकारणात मोठा भाऊ होण्यासाठी भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT