Central Squad Visit Affected Farm In Beed District News Sarkarnama
मराठवाडा

Heavy Rain-Flood News : 'आम्ही पुन्हा उभं राहू, एवढी तरी मदत करा साहेब' केंद्रीय पथकाला बळीराजाचे साकडे!

Central Squad Visit Affected Farm In Beed District : अतिवृष्टी- पूरस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने बुधवारी केली. इस्रोचे शास्त्रज्ञ शिवप्रसाद शर्मा, रस्ते वाहतूक व महामार्गचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे यांचा यात समावेश होता.

Jagdish Pansare

  1. केंद्रीय पथकाने बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

  2. शेतकऱ्यांनी सांगितले की पिकांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तात्काळ मदत करावी.

  3. केंद्र सरकारच्या पथकाकडून नुकसानीचा अहवाल तयार करून दिल्लीला सादर केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Beed News : अतिवृष्टी आणि महापूराने होत्याचे नव्हते झाले. शेती खरवडून गेली, पीकं मातीमोल झाली, जनावरे डोळ्या देखत वाहून गेली, घरात अन्नधान्याचा कण नाही. सरकारकडून फक्त आश्वसाने दिली जात आहेत. दिवाळी अंधारात गेली आणि आता कुठे केंद्राचे पथक झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले. बीडमध्ये साडेतीन तासात पाहणी करत या पथकाने गाशा गुंडाळला. अशाही परिस्थितीत धीराने 'आम्ही पुन्हा उभं राहू, एवढी मदत करा साहेब' अशी विनंती शेतकऱ्यांनी या पथकातील अधिकाऱ्यांकडे केली.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील देवळालीचे शेतकरी किशोर टिळेकरांनी पथकाला आपबिती सांगितली. अतिवृष्टी आणि पूराच्या संकटाने आमच्यावर काय परिस्थिती ओढावली हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. जगण्याचा, चरितार्थाचा आधार होती ती जमीन, दुभती जनावर वाहून गेली. कांदा चाळ दोन बोरवेल सारं काही गेलं. लोकांनी पाच-सहा गोण्या धान्य दिलं त्यावर गुजरान सुरू आहे. सारं उभ करायला 18 वर्ष लागली. ते क्षणात संपलं. आता आम्ही पुन्हा उभ राहू एवढी तरी मदत करा साहेब, अशी आर्त विणवणी आष्टी किशोर तळेकर यांनी केंद्रीय पथकाला केली.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बीड जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने बुधवारी केली. पथकात इस्रोचे शास्त्रज्ञ शिवप्रसाद शर्मा, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे यांचा समावेश होता. दौऱ्यात नुकसानीची पाहणी करतच काही शेतकऱ्यांशी पथकाच्या सदस्यांनी संवाद साधला. आमच्या शिवारातील माया नदीसह दोन ओढ्यांच्या पुरात आम्हा दोन भावंडांची सहा एकर जमीन पूर्णतः खरडून गेली.

दोन बोरवेल, चार गाई वाहून गेल्या. याच सहा एकरावर कुटुंबातील दहा सदस्यांचा जीवनचरितार्थ अवलंबून होता. आता माती आणून टाकायची म्हटलं तर दहा किलोमीटर अंतरावरील दादेगाव तलावा शिवाय पर्याय नाही. वीस लाखही आमची शेती उभी करायला कमी पडतील. घर न बांधता सात लाख खर्चून विहीर बांधली व्हती, ती पुरात संपली. डाळिंब, कांदा चाळ जनावरांचा चारा सारं संपल. शासनाची दमडीही अजून आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे जेवढं मांडणं शक्य होतं तेवढं मांडलं असं किशोर तळेकर पथकाच्या अधिकाऱ्यांना म्हणाले.

काहीं ठिकाण टाळत, वेगात दौरा

पथकाने अवघ्या साडेतीन ते पावणेचार तासात नियोजित दौऱ्यातील काही ठिकाणांना टाळत अहिल्यानगर जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळवला. बीड तालुक्यातील लिंबा रुई येथून पाहणीला पथकाने सुरवात केली होती. नियोजीत खोकरमोह भेट टाळत यवलवाडी ता. शिरूर येथे रस्ता, पुल नुकसानीची पथकाने पाहणी केली. कारेगाव ता.पाटोदा येथील खरडून गेलेल्या जमिनी, विहिरीचे नुकसान पाहून घाटापिंपरी व देवळाली ता. आष्टी या ठिकाणीं पथकाने पाहणी केली. कारेगाव येथील नुकसानीची पाहणी घाईत करत पथक निघून गेल्याचे शेतकरी म्हणाले.

राज्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी हे पथक जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीमध्ये शेतजमीन वाहून जाणे, धरणांचे पाणी ओसंडून वाहणे, दगावलेली जनावरे, घर व रस्ते यांचे नुकसान या सर्व बाबींची माहिती शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा अधीक्षक सुभाष साळवे यांनी केंद्रीय पथकाला दिली.

जिल्ह्यातील 8 लाख 6 हजार शेतकऱ्यांचे सुमारे 7 लाख 13 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. 1 हजारपेक्षा पेक्षा अधिक जनावरांचे प्राण गेले. 1313 घरांचे संपूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले.सार्वजनिक मालमत्तांना देखील मोठी झळ बसली आहे. बांधकाम विभागाचे रस्ते आणि पुलांचे,महावितरणचे खांब व वीजवाहिन्यांचे तर महामार्ग, शिक्षण,आरोग्य, पाणीपुरवठा,अंगणवाडी व ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधा या सर्वांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. 7472 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे जिल्हा अहवालात नमूद आहे.

FAQs

  1. प्रश्न: बीडमध्ये केंद्र सरकारचं पथक का आलं होतं?
    उत्तर: अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी.

  2. प्रश्न: कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं?
    उत्तर: बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी, आणि अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  3. प्रश्न: शेतकऱ्यांनी केंद्र पथकाकडे काय मागणी केली?
    उत्तर: शेतकऱ्यांनी आर्थिक मदत, पीकविमा नुकसान भरपाई आणि तात्काळ मदतीची मागणी केली.

  4. प्रश्न: पथकाने काय निरीक्षण केलं?
    उत्तर: पथकाने पूरग्रस्त शेतजमिनी, रस्ते, घरे आणि पिकांचे नुकसान तपासले.

  5. प्रश्न: पुढील पाऊल काय असू शकते?
    उत्तर: केंद्र सरकारकडे नुकसान अहवाल पाठवून मदत निधी मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT