Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire : ...म्हणूनच जलील काढतायत पळ; चंद्रकांत खैरेंनी साधले टायमिंग

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Political News : छत्रपती संभाजीनगर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण मुंबईमधून लोकसभा लढवू शकतो, असे विधान केले. या संदर्भातला प्रस्ताव असदुद्दीन ओवेसी यांना दिला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परंतु इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर मधून पळ काढत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

पाच वर्षात इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना एकही विकासकाम करता आलेले नाही. उलट त्यांच्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अनेक वेळा बिघडली. याचा परिणाम शेंद्रा-बिडकीन एमआयडीसीमध्ये उद्योग न येण्यामध्ये झाला. याशिवाय इम्तियाज यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप आहेत. त्यामुळे गेल्यावेळी केलेली चूक मतदार पुन्हा करणार नाहीतm, याची जाणीव आणि डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यानेच इम्तियाज जलील संभाजीनगरातून पळ काढत आहेत, असा दावा खैरे यांनी केला.

सलग चार वेळा संभाजीनगरमधून निवडून गेलेले शिवसेनेचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा 2019 च्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी पराभव केला. तेव्हापासून खैरी-इम्तियाज यांचा चुकून निवडून आलेले खासदार असा करतात. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असताना खैरे-इम्तियाज जलील पुन्हा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या पाच वर्षात इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून आपली भूमिका जोरकसपणे वठवली आहे. दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून जाताना मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.गेल्यावेळी सोबत असलेली वंचित बहुजन आघाडी (VBA) आता शिवसेना ठाकरे गटासोबत आहे. याचा फटका इम्तियाज जलील यांना बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी मिळालेल्या मुस्लिम -दलित एक गठ्ठा मतांच्या जोरावर इम्तियाज यांनी एमआयएमचा झेंडा लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघावर फडकवला होता. 2024 ची वाट मात्र त्यांच्यासाठी बिकट ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी मुंबईतून लोकसभा लढवण्याची व्यक्त केलेली इच्छा याच्याशी संबंध जोडला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून याही वेळी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या इम्तियाज यांच्यामुळे गेल्यावेळी खासदारकी गेली तेच आता मुंबईतून लढणार असं सांगत असल्यामुळे खैरे यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.

इम्तियाज हे मुंबईतच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात गेले तर परत निवडून येऊ शकणार नाहीत. मुंबई हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे तिथे उद्धव ठाकरे नेतृत्व करतात. त्यामुळे मुंबईतून खासदार होण्याचे स्वप्न इम्तियाज जलील यांनी पाहू नये ते कधीच पूर्ण होणार नाही, असेही खैरे यांनी म्हटले आहे.

संभाजीनगरची जनता इम्तियाज जलील यांच्या जातीयवादी आणि दहशतीच्या राजकारणाला कंटाळली आहे. त्यामुळे ते पुन्हा निवडून येऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळेच मुंबईतून लढण्याची त्यांनी केलेली भाषा म्हणजे इथून पळ काढण्याचाच प्रकार असल्याचा पुनरुच्चार खैरे यांनी केला केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT