Dr. Bhagwat Karad- Chandrakant Khaire News sarkarnama
मराठवाडा

Bhagwat Karad On Water Issue : हो.. महापालिकेच्या सत्तेत आम्हीही, पण रिमोट कंट्रोल खैरेंचा म्हणून पाणी प्रश्नाला तेच जबाबदार!

Dr. Bhagwat Karad alleges Chandrakant Khaire controls the municipal corporation and is responsible for the city's long-standing water issues. : महापालिकेच्या सत्तेत पंचवीस वर्ष शिवसेनेसोबत असताना रखडलेल्या पाणी प्रश्नाला एकटी शिवसेना जबाबदार कशी? असा प्रश्न कराड यांना विचारला.

Jagdish Pansare

BJP Politics News : छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न रखडला याला जबादार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांचे नेते चंद्रकांत खैरे हेच आहेत. निश्चित आम्ही महापालिकेच्या सत्तेत त्यांच्यासोबत होतो. पण 1988 पासून फक्त तीन महापौर भाजपाचे झाले, त्यात मला दोनवेळा संधी मिळाली, तर विजय रहाटकर, बापू घडामोडे हे प्रत्येकी एकदा महापौर होते. परंतु युतीची सत्ता असताना महापालिकेत चंद्रकांत खैरे यांचाच शब्द अंतिम असायचा.

सगळे ठराव त्यांच्या मान्यतेशिवाय होत नव्हते. रिमोट कंट्रोलच त्याच्या हाती होता. व्हिजन नसलेल्या खैरे यांच्यामुळेच वीस वर्ष शहराचा पाणी प्रश्न रखडला, असा थेट आरोप भाजपाचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी केला. आम्ही वेळोवेळी विरोध केला, पण तो मोडून काढण्यात आला. मात्र आता राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे, आम्ही शहरासाठी 1680 कोटींची पाणी योजना दिली. मी केंद्रात मंत्री असताना ती अमृत योजनेत सामाविष्ट करून घेत त्यासाठी अतिरिक्त निधी आणला. राज्यातील सर्वात मोठी ही पाणी योजना आहे, असा दावाही कराड यांनी केला.

शहरातील पाणी प्रश्नाला 'सकाळ'ने वाचा फोडल्यानंतर खासदार डाॅ. भागवत कराड यांनी सकाळ'थेट संवाद' मध्ये सहभाग घेत आपली भूमिका मांडली. महापालिकेच्या सत्तेत पंचवीस वर्ष शिवसेनेसोबत असताना रखडलेल्या पाणी प्रश्नाला एकटी शिवसेना जबाबदार कशी? असा प्रश्न कराड यांना विचारला तेव्हा त्यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Kahire) हेच पाणी प्रश्नाला जबाबदार असल्याचा आरोप केला. 1988 मध्ये महापालिकेत पहिल्यांदा सत्ता आली तेव्हापासून ते आजतागायत सर्वाधिक महापौर हे शिवसेनेचे होते. त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या भाजपापेक्षा अधिक असायची.

मा‍झ्या महापौर पदाच्या काळात अनेक ठरावावर चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानातून निर्णय व्हायचे. खासदार असल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात त्यांचा एक खांबी तंबू असल्यासारखी परिस्थिती होती. समांतरसह ज्या पाणी योजना रखडल्या किंवा बंद पडल्या त्याला चंद्रकांत खैरे हेच जबाबदार आहेत. व्हिजन नसलेल्या खैरेंनी शहराच्या विकासकामात खोडा घातला, असा आरोप कराड यांनी केला. परंतु आता खैरे हे राजकारणातून बाद झाले आहेत, त्यांचे अस्तित्व राहिलेले नाही. शिवाय राज्यात आणि केंद्रात भाजपा महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या चाळीस लाख झाली तरी मुबलक पाणी पुरेल अशी योजना आपण आणली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेला केंद्राच्या अमृत दोन मध्ये सामविष्ट केल्याने ही राज्यातील सर्वात मोठी पाणी योजना ठरणार आहे. महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे आणि कंत्राटदाराकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने ही योजना रखडली आहे. परंतु आम्ही सातत्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करत आहोत. जून अखेर पर्यंत जुन्या जलावाहिनीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर शहराला तीन ते चार दिवसाला पाणी पुरवठा होऊ शकेल, असे कराड यांनी स्पष्ट केले.

तसेच नव्या 2740 कोटींची पाणी पुरवठा योजना पुर्ण होऊन चोवीस तास मुबलक पाणी मिळण्यासाठी 2026 जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागेल, असेही कराड यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षाने पाणी प्रश्नावर राजकारण करू नये. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मंजूर झालेल्या पाणी योजनेची निविदा उद्धव ठाकरे यांनी दोन वर्ष काढली नाही, त्यामुळे खऱ्या अर्थाने ही योनजा रखडली, असा आरोपही कराड यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT