Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

ShivSena UBT : सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसैनिक हिंमतीने लढले; पण, आयोगाने सगळं मातीमोल केलं... खरैंसमोर शिवसैनिकांनी मांडल्या व्यथा

Chandrakant Khiare News : चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे उमेदवारांचे नुकसान झाल्याचा आरोप केला. निलंगा-लातूरमधील दडपशाही, पळवापळवी प्रकरणांवर कारवाईची मागणी केली आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून होणारी फोडाफोडी, पळवापळवीचे राजकारण, पैशाचा वारेमाप वापर या सगळ्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हिंमतीने लढत होता. आमचे उमेदवार पळवण्याचे प्रकार झाले, त्यांना शांत बसण्यासाठी दबाव आणण्यात आला. तरीही अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार दिले, निलंग्यात तर आमचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती होती, असा दावा पक्षाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.

निवडणूक आयोगाच्या एका चुकीच्या निर्णयाने उमेदवारांचे नुकसान तर झालेच, पण प्रशासकीय यंत्रणा आणि त्यावर होणारा खर्चही वाया गेला. निवडणूक आयोगाचे अधिकारी, प्रकिया राबणारे जिल्हाधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना हे माहित नव्हते का? ज्यांच्यामुळे ही वेळ आली त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणीही चंद्रकांत खैरे यांनी केली. लातूर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि निलंगा नगरपालिकेतील उमेदवार निवडणूक स्थगित झाल्यानंतर आज खैरेंची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी खैरे यांनी आयोगाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.

ताकदीने निवडणुकीची तयारी केलेली असताना आता त्या लांबल्या आहेत. यापुढे काय करायचे? या संदर्भात चर्चा करण्यासाठी हे पदाधिकारी, उमेदवार आले होते. संघटनात्मक बांधणीमध्ये लातूरची जबाबदारी चंद्रकांत खैरे यांच्यावर असल्याने ते आपली कैफियत मांडण्यासाठी आले होते. पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याशी चर्चा करून पुढे काय करायचे? यावर सविस्तर बोलणार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त करतानाच सत्ताधारी पक्षांनीच हे सगळे घडवले असल्याचा आरोप खैरे यांनी केला.

बीड आणि गेवराईमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षामध्ये मारामाऱ्या झाल्या. स्थानिक पातळीवर या पक्षांमध्ये अनेक वाद आहेत. तिकडे मुंबईत मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र होते, याकडेही खैरे यांनी लक्ष वेधले. सत्ताधारी पक्षाकडे प्रचंड पैसा आहे, त्याचा वारेमाप वापर झाल्याचेही दिसते. महाविकास आघाडी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असा कुठलाही पैसा नाही.

निवडणूक पुढे ढकलल्यामुळे आम्ही जी लढण्याची तयारी केली होती, ती आता पाण्यात गेली आहे. सत्ताधाऱ्यांचा दबाव, फोडाफोडी, पळवापळवी या सगळ्यावर मात करून आमचे शिवसैनिक हिमतीने लढत होते. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती होती. परंतु निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे या सगळ्यावर पाणी फिरले आहे. या निर्णयाचा सगळ्यांनाच त्रास झाला आहे. आता पुढे कशी वाटचाल करायची? याबाबत मुंबईतील नेत्यांशी चर्चा करून दिशा ठरवू, असेही खैरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT