Bhaskar Bhagre, Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange and Sharad Pawar : छगन भुजबळांचे कट्टर विरोधक अन् शरद पवारांचा 'हुकमी पत्ता' मनोज जरांगेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?

Jagdish Patil

Jalna News, 19 July : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी शुक्रवारी (ता.19 जुलै) रोजी अंतरवाली सराटी येथे येऊन मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील आणि भगरे यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.

शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. राज्यात आधीच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाला आहे. शिवाय राजकीय वातावरण देखील तापलं आहे.

अशातच भगरे यांनी मनोज जरांगे पाटलांची (Manoj Jarange Patil) भेट घेतल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आपण केवळ जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो होतो, असं भगरे यांनी सांगितलं आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर खासदार भगरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "मराठा समाजामध्ये अनेक गरीब कुटुंब आहेत, त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाची आहे. तसंच जरांगे पाटलांच्या भूमिकेशी आमचा पक्ष आणि मी सहमत आहोत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आलो होतो. शरद पवारांची भूमिका देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच आहे. त्यामुळे लोक काय अर्थ काढतात यापेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाव आमच्या पक्षाची भूमिका असून माझीही तीच राहणार," असं भगरे यांनी सांगितलं.

उद्यापासून आमरण उपोषण

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आता आक्रमक झाले आहेत. सरकारला दिलेली मुदत संपल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या 20 जुलैपासून ते उपोषणाला बसणार आहेत. शिवाय त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जरांगे उद्या उपोषणाला बसणार आहेत. तर 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जनजागृती आणि शांतता रॅली मराठा समाजाकडून काढण्यात येणार आहे. ही रॅली सोलापुरातून सुरु होईल तर 13 ऑगस्टला नाशिकमध्ये तिचा समारोप होणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.

तर समाज म्हणतो तसं मी ऐकतो, वागतो पण उपोषण करण्यासाठी त्यांचा विरोध असतानाही मी समाजाचे ऐकत नाही, कारण त्यांचा त्रास दूर व्हावा, ही माझी इच्छा आहे. सरकारने माझे आमरण उपोषण सोडवले नाही. तर रूग्णवाहिकेमध्ये जाऊन रॅलीत सहभागी होईल. असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT