Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पराभवाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शंभर उमेदवार देत फुगवलेला फुगा सहा नगरसेवक निवडून आल्यानंतर फुटला. यात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या दुसऱ्यांदा निवडून आला, तर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि दोन दशकापासून पक्षाची सूत्रं जिल्हा प्रमुख म्हणून स्वतःच्या हाती ठेवणारे अंबादास दानवे हे आपल्या भावालाही निवडून आणू शकले नाहीत, अशी परिस्थिती. आता या नामुष्कीची जबाबदारी नेमकी खैरेंची की दानवेंची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सलग दोन लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात शिवसेना (Shivsena) उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाची पाटी कोरी राहिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फुलंब्री वगळता पक्षाला जिल्ह्यात एकही नगराध्यक्ष निवडून आणता आला नाही. आता महापालिकेत अंबादास दानवे यांच्या हाती सगळी सूत्रं देऊनही मशाल सहा ठिकाणीच पेटू शकली. खैरे-दानवे यांच्यातील अतंर्गत वादात पक्षाचे मोठे नुकसान झाले. मातोश्रीवरून खैरेंना दुर्लक्षित करत दानवे यांना झुकते माप गेल्या काही वर्षात दिले गेले. पण यातून पक्षात दानवेंची एकाधिकारशाही सुरू झाली.
खैरे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना रागावण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे, असे कॅमेऱ्यासमोर सांगणाऱ्या दानवे यांनी मातोश्रीवरून खैरे यांचे पक्ष पद्धतशीरपणे छाटले. पक्ष, संघटनेच्या विस्तारात बाधा नको, या विचारातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही दानवेंचा शब्द खाली पडू दिला नाही. पण यातून पक्षाचा विस्तार होण्याऐवजी अंतर्गत नाराजी आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढली. ती इतकी की विरोधक पक्षाला 'शिल्लक सेना' म्हणून हिणवू लागले.
मुंबईत उद्धव ठाकरेंनी महायुतीला टक्कर देत सत्तर नगसेवक निवडून आणले. पण संभाजीनगरात फ्री हॅन्ड दिलेल्या अंबादास दानवे यांना मात्र शंभर जागा लढवून दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. ज्या माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामूंना पक्षात प्रवेश देऊन आपण खूप मोठा तीर मारला असा दानवे यांचा समज झाला होता, त्या मामूंचा विजय हा वैयक्तिक ताकदीवर झाला आहे. उलट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते राहिलेल्या अंबादास दानवे यांना आपल्या भावालाही वार्डातून निवडून आणता आले नाही. चंद्रकांत खैरे यांनी पुतण्याला गुलमंडी प्रभागातून निवडून आणत कसेबसे नाक राखले.
तब्बल दोन दशकांपासून जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या अंबादास दानवे यांच्या कार्यकाळात पक्ष रसातळाला गेला. आधीच खैरे-दानवे यांच्या वादामुळे शिवसैनिकांची कोंडी होत होती. त्यात दानवे यांनीही मी म्हणेल तेच अंतिम, म्हणत एकाधिकारशाही पक्षात आणली. याला कंटाळून अनेकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. उरलीसुरली पक्षाची इभ्रत आता महापालिका निवडणूकीत गेली. शंभर जांगा लढवून फक्त सहा जागांवर पक्षाला यश हे खरे तर अपयशच म्हणावे लागेल. या पराभवाचे आत्मचिंतन करत जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तरी 'मातोश्री'वरून पक्षाच्या अपयशाची कारणे शोधली जातील का? असा प्रश्न उरल्यासुरल्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.
दानवे विरोधी सूर..
शिवसेना फुटीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे दोन नेते व सुभाष पाटील हे उपनेते आहेत. पण पक्षाला लागलेली गळती थांबविण्यात ते अपयशी ठरले. शिवसेना फुटीनंतर झालेली महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे ठाकरे सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व जबाबदारी अंबादास दानवे यांच्याकडे दिली होती. तर दुसरे नेते चंद्रकांत खैरे निवडणुकीपासून वंचित होते.
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वाधिक गळती ठाकरे सेनेला लागली. या गळतीमुळे पक्षावर काहीच परिणाम झालेला नाही, हे दाखविण्यासाठी दानवे यांनी 100 जागेवर उमेदवार देऊन फुगा निर्माण केला, पण निकालानंतर हा फुगा फुटला. त्यामुळे पक्षातील 'दानवेगिरी'विरोधात आता सूर आळवला जात आहे. दोन दशकापासून दानवे जिल्हा प्रमुखपदावर कायम आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.