Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

मुख्यमंत्री ठाकरेंचीही औरंगाबादमध्ये सभा! त्याच ऐतिहासिक मैदानातून घेणार समाचार

सरकारनामा ब्युरो

पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्मााण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादची (Aurangabad) १ मे रोजी होणारी नियोजीत सभा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शिवाय या सभेला आता पोलिसांकडूनही परवानगी मिळाली आहे. राज ठाकरे यांची यापूर्वीची गुडीपाडव्याची सभा, त्यानंतरची ठाण्यातील उत्तरसभा आणि आता औरंगाबाद येथे होणारी सभा या, सर्व सभांमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे राज्यभरात वेगळेच वातावरण तयार झाले आहे.

या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर मशिदींवरील भोंगे, त्याबाबतची राज्य सरकारची भूमिका, ३ मे रोजीचा त्यांनी दिलेला अल्टिमेटम आणि त्यानंतरची मनेसची भूमिका असे मुद्दे असण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील निशाण्यावर असण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज ठाकरेंच्या या सभेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही येत्या ८ दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये जाहीर सभेची तयारी सुरु आहे. त्यासाठी सध्या प्राथमिक पातळीवर चर्चा आणि नियोजन सुरु असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक जाहीर सभा घेवून नवहिंदुत्ववाद्यांना उत्तर देणार असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे हे देखील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच सभा घेणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेवरील आणि सरकारवरील हल्ल्यांना औरंगाबादमध्ये जावूनच उत्तर देणार असे म्हटल्याल चुकीचे ठरणार नाही.

ज्या मैदानावर बाळासाहेबांनी भोंग्यांना विरोध केला होता त्याच मैदानावर उद्धव ठाकरे सभा गाजवणार...

या सभेत उद्धव ठाकरे नेमके काय आणि कोणत्या मुद्दांवर बोलणार हे अद्याप गुलदस्त्यामध्ये असले तरीही सध्या मशिदींवरील भोंग्याबाबत राज्य सरकारने सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे भोंग्यांबाबत काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण उद्धव ठाकरे हे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार आहेत, तिथे कधी काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रेकाॅर्डब्रेक सभा झाल्या आहेत.

याच ठिकाणी ८ मे १९८८ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची पहिल्यांदा मागणी केली होती. त्यानंतर २००५ मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेदरम्यान अजान झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी अजानच्या भोंग्यांना जोरदार विरोध केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT