Marathwada Political News
Marathwada Political News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : बिअरचा खप वाढवू पाहणाऱ्या सरकारला बुद्धी दे; राजुरेश्वराला अभिषेक घालत तरुणाची बॅनरबाजी...

तुषार पाटील

Jalna News : राज्यात बिअर विक्री कमी झाली आहे, तिचा खप वाढवण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पाच आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (Maharashtra News) या प्रकारावरून विरोधक तर सरकारवर तुटून पडले होतेच, पण समाज माध्यमांमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच मुद्द्यावर एका तरुणाने जालना जिल्ह्यातील राजुरेश्वर गणपतीला अभिषेक घालत राज्यात बिअरचा खप वाढवू पाहणाऱ्या `सरकारला बुद्धी दे`, असे साकडे घातले आहे.

एवढ्यावरच न थांबता या तरुणाने शहराच्या प्रमुख रस्त्यांवर सरकारला टोला लगावणारे बॅनर लावून सर्वांचे लक्षही वेधून घेतले आहे. (Jalna) सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असला तरी राजूर येथे शासनाच्या विरोधात लागलेल्या एका अनोख्या बॅनरची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. (NCP) शासनाने नुकताच बिअर विक्री वाढीसंदर्भात एक अभ्यास गट नियुक्त करून अध्यादेश काढला, पण तो समाज माध्यमांवर आला आणि सरकारवर टीकेची झोड सुरू झाली.

राज्यात युवकांच्या बेरोजगारी, ड्रग्स प्रकरण, महिलांची सुरक्षा, एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा असे अनेक महत्त्वाचे प्रश्न राज्यापुढे आहेत. (Marathwada) पण सरकारला यापेक्षाही बिअर विक्रीतून महसूल गोळा करणे जास्त गरजेचे वाटत आहे. नेमकं यावर बोट ठेवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश जाधव यांनी सरकारच्या निषेधार्थ बॅनरबाजी करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारवर उपहासात्मक टीका करताना `मिल बैठेंगे तीन यार` या वाक्यातून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही दिले आहे. तसेच राजूर येथील गणपतीचरणी अभिषेक करून शासनाला सद् बुद्धी योवो, अशी प्रार्थना केल्याचे मंगेश जाधव यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांचा पाढा वाचला आहे.

यात अडीच लाख रिक्त पदांची भरती, पेपरफुटी विरोधात कडक कायदा करणे, शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रिम भरपाई, ड्रग्जच्या विळख्यातून युवकांना वाचवणे, क्रीडा विभागाचे सक्षमीकरण करणे, बेरोजगार युवकांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफ करणे, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. बिअर विक्री वाढवण्यापेक्षाही हे विषय जास्त महत्त्वाचे आहेत. सरकारने राज्यातील युवा, शेतकरी, महिलांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT