धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी दिपक बोऱ्हाडे यांचे उपोषण बाराव्या दिवशीही सुरूच आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी बोऱ्हाडे यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले असून आंदोलनाला नवा टप्पा प्राप्त झाला आहे.
Deepak Borhade Protest : धनगर समाजाला एसटीतून आरक्षण या मागणीसाठी जालन्यात आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या बाराव्या दिवशी सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चेसाठी दाखल झाले आहे. मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपोषणस्थळी ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिपक बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तुमच्या मागण्या योग्य आहेत, त्या कायदेशीर पद्धतीनेच सोडावाव्या लागतील. तुम्ही मुंबईत या, चर्चा करू आणि मार्ग काढू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
उपोषण हा आपला प्रश्न ऐरणीवर आणण्याचे माध्यम असते, तुमच्या उपोषणाने धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला आहे. पण हा प्रश्न सोडवायचा असेल तर तो चर्चेतूनच सुटेल. धनगर आरक्षण हे केंद्र सरकारने दिलेले संवैधानिक आरक्षण आहे. त्या संदर्भात शासनाला कुठलाही जीआर काढण्याचा अधिकार नाही. न्यायालयात या संदर्भात अनेक याचिका आहेत. या सगळ्यातून मार्ग निश्चित काढू, अॅडव्होकेट जनरल यांना बोलावू सगळ्यांशी चर्चा करू. मुंबईत शिष्टमंडळ घेऊन या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांना आवाहन करत चर्चेचे निमंत्रण दिले.
पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन, आमदार अर्जून खोतकर, नारायण कूचे, संतोष दानवे, हिकमत उढाण यांची यावेळी उपस्थिती होती. दिपक बोऱ्हाडे यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी शिष्टमंडळाने त्यांच्याशी तासभर चर्चा केली. तसेच उपोषण मागे घेऊन त्यांनी मंगळवारीच मुंबईत आपल्या शिष्टमंडळाला घेऊन चर्चेला यावे,असे आवाहन केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सहीने आमच्या मागण्यांवर लेखी आश्वासन द्या, त्यावर आरक्षण (Dhangar Reservation) चळवळीतील तज्ञ, तसेच लोकांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे दिपक बोऱ्हाडे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
चर्चा निष्फळ, संकटमोचक परतले..
धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्याच्या अंबड चौफुली येथ नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दिपक बोऱ्हाडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी जालन्यात नुकताच भव्य इशारा मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली. आज सरकारच्या वतीने गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे शिष्टमंडळ दिपक बोऱ्हाडे यांच्याशी चर्चा करायला आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोऱ्हाडे यांच्याशी पंधरा मिनिटे फोनवरून चर्चा केली. मुंबईत चर्चेचे निमंत्रण देत उपोषण सोडवण्याची विनंतीही त्यांनी केली. यावर मागण्यावर लेखी उत्तर द्या, अशी मागणी बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ती तात्काळ मान्य करत उद्या, या संदर्भात लेखी पत्र देतो, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर पुन्हा दिपक बोऱ्हाडे यांच्याशी पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार बबनराव लोणीकर यांनी अर्धा तास चर्चा केली.
परंतु उपोषण सोडवण्यात या शिष्टमंडळाला यश आले नाही. आता दिपक बोऱ्हाडे यांच्या मागण्यांवर सरकारकडून उद्या ड्राफ्ट तयार करून तो पाठवण्यात येणार आहे. तो तपासून मंगळवारी मुंबईत बोऱ्हाडे यांनी आपल्या शिष्टमंडळासह चर्चेला यावे, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. यावर लगेच मी मुंबईला येऊ शकत नाही, सरकारच्या ड्राफ्टवर तज्ञ, वकीलांचा सल्ला आणि समाजाचे मत विचारात घेऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर मुंबईला कधी यायचे हे कळवले जाईल, असे दिपक बोऱ्हाडे यांनी शिष्टमंडळाला सांगीतले.
तर मी उपोषणाला बसेन..
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी दिपक बोऱ्हाडे यांच्या प्रकृतीची सगळ्यांनी काळजी घ्यावी. धनगर आरक्षणाचा प्रश्न त्यांनी उपोषण करून सरकारपर्यंत पोहचवला आहेच. आता त्यांची काळजी आपण घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनगर आरक्षणाच्या मागणीवर सकारात्मक आहेत. त्यामुळे उपोषण मागे घेतले पाहिजे, नाहीतर मी ही तुमच्यासोबत इथेच बसते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी आज जालन्यातच मुक्काम करते, उद्या पून्हा येते पण तेव्हा दिपक भाऊंनी उपोषण सोडून मुंबईत चर्चेला यायचे मान्य केले पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
व्यासपीठावर दिपक बोऱ्हाडे आणि सरकारी शिष्टमंडळाची चर्चा सुरू असतांना उपस्थित धनगर समाज बांधवांकडून घोषणाबाजी सुरू होती. ये तो झाँकी है, मुंबई अभी बाकी है, क्या हुआ तेरा वादा, आरक्षण आमच्या हक्कांच म्हणत मेंढ्या घेऊन मुंबईत धडक देऊ, अशा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्र.१. दिपक बोऱ्हाडे यांनी उपोषण का सुरू केले?
उ. धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी.
प्र.२. उपोषण कितव्या दिवशी पोहोचले आहे?
उ. हे उपोषण बाराव्या दिवशी पोहोचले आहे.
प्र.३. मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ. त्यांनी बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि मुंबईत येण्याचे आवाहन केले.
प्र.४. या आंदोलनामुळे काय घडामोडी घडल्या?
उ. धनगर आरक्षणाच्या मागणीला अधिक राजकीय वजन मिळाले आहे.
प्र.५. आंदोलनाचा पुढील टप्पा काय असू शकतो?
उ. बोऱ्हाडे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री व इतर नेत्यांशी चर्चा करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.