Ajit Pawar  Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar : ''राजकीय जीवनात कुणीच कायमचं शत्रू नसतं, आणि...'' शिंदे, फडणवीसांच्या समक्ष अजित पवारांचं विधान!

Mayur Ratnaparkhe

Beed News : बीड जिल्ह्यातील परळीमध्ये मंगळवारी महायुती सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या तिन्ही नेत्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

राज्याचे कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमासाठी संपूर्ण ताकद पणास लावल्याचे दिसून आले. शिवाय, कार्यक्रमाच्या मंचावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणात बोलताना याच पार्श्वभूमीवर एक विधान केलं, अजित पवार म्हणाले ''राजकीय जीवनात कुणीच कायमचं शत्रू नसतं, कायमचं मित्र नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही सगळे पुढे जात आहोत.

इथे अनेकांच्या विचारधारा वेगवेगळ्या असतील, परंतु शेवटच्या माणसला मदत झाली पाहीजे. इथला सर्वांगिण विकास झाला पाहीजे. सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हे शासन माझ्यासाठी काम करतय. ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) सतत मनात असते आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहोत.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाषणाच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ''लोकांना हेलपाटे मारू द्यायचे नाही, तर आपणच लोकांच्या दारी जायचं. केंद्रसरकार, राज्यसरकारच्या योजना असतील त्या लाभार्थींच्या दारी जाऊन त्यांना द्यायच्या. कोट्यवधी लोकांना आपण लाभ दिला आहे. अजूनही इतर जिल्ह्यांमध्ये जायचं आहे. तसंच आज महायुतीचं शासन बीडकरांच्या दारी आलं आहे. ही भूमी देव-दैवतांची, संत, महात्म्यांची आणि थोर पुरुषांची भूमी आहे आण परळीच्या वैजीनाथाची ही भूमी आहे. महायुतीच्या सरकारला बळ दे असं साकडं मी घालतो आहे.''

तसेच ''आपल्या इथे पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे समुद्राकडे जाणारं पाणी नाशिक आणि वरील भागातून नाथसागरात कसं येईल, तिकडच्याही लोकांचं भागेल आणि इथल्या शेतकऱ्यांनाही मदत होईल, अशाप्रकारची योजना या सरकारने आखलेली आहे. या योजनेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. जलसंपदा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadanvis) त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे.'' असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

याशिवाय ''पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार अतिशय सक्षमपणे काम करतं आहे. याचा प्रत्यत नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून संपूर्ण देशाला आला आहे. संपूर्ण जगात भारताचा मान वाढला पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. यासाठी आपण पंतप्रधान मोदींना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे, कारण अशाप्रकारचं नेतृत्व सारखं सारखं मिळत नसतं. त्यामुळेच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत.'' असं यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं.

विरोधकांना लगावला टोला, म्हणाले... -

विरोधकांवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ''कधीकधी बातम्याही येतात की यांच्यात मतभेद आहेत. विरोधकांकडे आज कुठलाही मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे काहीपण बातम्या पसरवण्याचं काम केलं जातं. आम्ही सर्वजण अतिशय एकोप्याने सर्व जाती-धर्माला सोबत घेत पुढे जात आहोत.

आज महाराष्ट्रात जाती-जातींत वेगवेगळ्या मागण्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार सर्वांना दिलेला आहे. तुम्ही तुमच्या मागण्या कायदा हातात न घेता, रास्त पद्धतीने मागू शकतात. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळव्यात बोलताना शब्दही दिला आहे.''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT