Maratha Reservation News : बीडच्या मांजरसुंबा येथील अंतिम इशारा सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा त्यांना आवाहन केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी फडणवीस साहेब तुम्हाला मिळाली आहे, तिचं सोनं करा, अशा शब्दात मुंबईला निघण्यापुर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासह, सगेसोयरेची अंमलबजावणी व इतर मागण्याची सरकारला आठवण करून दिली. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही, तुम्ही आरक्षण द्या, आम्ही मंत्रालयावर गुलाल उधळू, याचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केला. फडणवीस मराठा समाजासोबत हे मुद्दाम करत आहेत आणि ही त्यांची एक प्रकारे आमच्यावरची खुन्नस आहे. फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
यापूर्वीच्या सरकारमध्ये गिरीश महाजन यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचे मान्य केले होते, पण आता त्यांच्याच सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. एक घर, एक गाडी 27 तारखेला निघालीच पाहिजे. एकानेही घरी थांबायचे नाही, मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघायचे. आझाद मैदानावर होणाऱ्या या आंदोलनात कीर्तनकार सुद्धा सहभागी होणार आहेत, त्यामुळे हा एक भव्य-दिव्य कार्यक्रम असेल. (Devendra Fadnavis) फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे, सोनं करा, असेही मनोज जरांगे म्हणाले.
सरकारसुद्धा उलथून टाकू शकतो..
आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने तातडीने मागे घ्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे. ज्यांनी या आंदोलनात बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही, त्यामुळे ती कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी 26 ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सरकारसुद्धा उलथून टाकू शकतो, असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी यावेळ दिला.
मुंबईत आपल्याला शांततेत जायचं आहे, कोणीही पोलीसांशी वाद घालायचा नाही. पण मुंबईत मराठ्यांच्या पोराला काठीने जरी डिवचले तर पानंद रस्ता सुद्धा मोकळा राहणार नाही. 26 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये येणार म्हणजे येणारच, मी थांबत नसतो असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. एकदा अंतरवाली सोडली तर मग सरकारसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. कोणत्याही नेत्याला घाबरून घरी न बसता मुंबईला या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
फडणवीसांना अंतरवालीत बोलावले होते..
दरम्यान, दोन महिन्यापुर्वी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून मराठा समाजाच्या व्यथा तुमच्या समोर मांडायच्या आहेत, असे सांगितले होते, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. तुम्ही अंतरवालीत या, असे मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो होतो, पण देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील तर आडमुठे कोण हे मुंबईकरांनी सांगावे? असे जरांगे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.