Nagpur News : बीड जिल्हा सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.या जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली असून तेथील कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच बीडचं पालकमंत्रिपद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांपैकी एकानं घ्यावं अशीही मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या (Beed) पालकमंत्रिपदावरुन सूचक विधान केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी (ता.24) मीडियाशी संवाद साधला.याचवेळी त्यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून तापलेल्या राजकारणावरही रोखठोक भाष्य केलं आहे.ते म्हणाले,महायुतीमधील तीनही पक्षांनी येथील पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कोणी कितीदी दावे केले तरी आणि कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असे संकेत फडणवीस यांनी दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिवेशनावेळी संसदेत केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतच्या वक्तव्यावरुन सध्या विरोधकांकडून वातावरण तापवलं जात आहे. सध्या देशात चांगलाच गदारोळ सुरू आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काँग्रेसच्यावतीने संसदेत फोटो लावून आंदोलन केले होते. त्यांनी माफी मागावी अशी मागणी व काँग्रेसच्यावतीने केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी काँग्रसनेच देशाची माफी मागण्याची गरज असल्याचे सांगितले.
अमित शाह यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवला आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला उघडे पाडले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कसा व केव्हा विरोध केला हे सर्व जगासमोर आणलं आहे. त्यानंतर गोंधळलेली काँग्रेस आता देशासमोर नाटक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसने कधीही बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. इंदू मिल जागेवर स्मारकासाठी इंचभरही जागा दिली नाही. मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार कोटी रुपयांची जमीन मिळाली. बाबासाहेबांचे लंडनचे घर आम्ही विकत घेतले. बाबासाहेबांच्या स्मृतीला जपण्याचे काम केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचाही त्यांनी समाचार घेतला. बीड आणि परभणीच्या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सेफ नसल्याची टीका केली होती. यावर फडणवीस यांनी महाराष्ट्र देशातील कुठल्याही राज्यापेक्षा सेफ राज्य आहे. कुठलीही घटना घडल्यानंतर असं राजकारण करणं त्यांना शोभत नाही, असं प्रत्युत्तर सुळे यांनी दिलं.
फडणवीस म्हणाले, विरोधकांनी कुठल्याही घटनेचे राजकारणच करायचे ठरवल्याचे दिसते. संवेदनशील मुद्दे उकरून काढायचे आणि जाती-जातीत विद्वेष निर्माण करायचा असेच विरोधकांचे धोरण आहे. काँग्रेसकडून आरक्षणाला विरोध होत आला आहे, हे जेव्हा मोदीजींनी संपूर्ण जगासमोर आणलं, तेव्हा काँग्रेस पार्टी अशाप्रकारचं नाटक आता करत आहे असान हल्लाबोलही त्यांनी केला.
खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही. लंडनमध्ये आंबेडकर जिथे शिकले ते घर लिलावात निघालं होतं, काँग्रेसकडे अनेक संघटनांनी मागणी केली, हे घर लिलावात जाऊ देऊ नका, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा ते घर आम्ही परत घेतलं.
महू असो, दीक्षाभूमी असो, अलिपूर रोड असो प्रत्येक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे भाजप सरकारनं केलं. काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे. आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे. मात्र, त्यांना कुठलाही सन्मान कधीही काँग्रेसने दिलेला नाही. भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही. हे देखील मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो. काँग्रेस सरकारनं इंदू मिलमधील स्मारकासाठी जमीन देखील दिली नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.