Chhatrapati Sambhajinagar : 'लबाडांनो पाणी द्या' म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संभाजीनगरमध्ये गेल्या तीन-चार दिवसापासून आंदोलन सुरू आहे. महिनाभर आंदोलन करत मे मध्ये शहरात पाण्यासाठी भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने शहरातील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये संभाजीनगरकरांसाठी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. पुढे राज्यात सत्तांतर झाले अन् उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले होते. कोरोना महामारीचा तो काळ असल्याने या योजनेला गती मिळू शकली नाही. त्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या जनतेची जाहीर माफीही मागितली होती. माफी मागून ते 'मोकळे' झाले, पण 2025 उजाडले तरी पाणी प्रश्न काही सुटला नाही.
दरम्यान, विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाने महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना पक्षावर जोरदार टीका केली होती. संभाजीनगरकरांना (Chhatrapati Sambhajinagar) पाणी न मिळण्याचे पाप उद्धव ठाकरे यांचेच असल्याचा घणाघात तेव्हा फडणवीस यांनी केला होता. नागरिकांना पाण्यासाठी त्राहीमाम करायला लावणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्षच जबाबदार असल्याचे फडणवीस म्हणाले होते. तर राज्यात आपली सत्ता आली तर सहा महिन्यात पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार आले. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ संपून आता मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. संभाजीनगरचा पाणी प्रश्न मात्र आहे तिथेच आहे. एकमेकांना दुसने देत शिवसेना-भाजपाचे नेते माध्यमांसमोर भांडत आहेत. तर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधाऱ्यांना लबाड ठरवत रस्त्यावरचे आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे पुन्हा आश्वासन दिले. आताच्या पिढीने दुष्काळा पाहिला, पण तुमच्या दुसऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला होता. आता 2022 च्या मे महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेवर पाण्यासाठी काढलेल्या जन आक्रोश मोर्चाची फडणवीस यांना पुन्हा आठवण झाली. उद्धवसेनेच्या आंदोलनाचा परिणाम म्हणूनही मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात येत असलेल्या पाणी प्रश्नाच्या आढाव्याकडे पाहिले जात आहे.
शहराच्या पाणी प्रश्नावर फडणवीस यांनी आज ऑनलाईन पद्धतीने आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयातून घेतलेल्या या आढाव्याच्यावेळी पाणी पुरवठा योजनेतील सगळे अडथळे दूर करा आणि लोकांना पाणी द्या, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणेला दिल्याची माहिती आहे. आता फडणवीस यांनी यात लक्ष घातल्यानंतर तरी योजनेच्या कामाला गती येते का? हे पहावे लागेल.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.