Dhananjay Munde: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नजीकच्या काळात होणाऱ्या विस्तारात त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला या चर्चा सुरु असतानाच ज्याच्यामुळे मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता त्या वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम मात्र वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला आहे.
संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गत जवळपास दीड वर्षांपासून कराड तुरुंगातच आहे. तेव्हापासून त्याचे बाहेर येण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी वाल्मिक कराडने जामीनासाठी बीड सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र तिथे दिलासा मिळाला नव्हता.
त्यानंतर वाल्मिक कराड याने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. यापूर्वी 26 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने वाल्मीक कराडच्या जामीनास नकार दिला होता. या फेटाळलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा यासाठी कराडच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायमुर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमुर्ती एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
खंडपीठाने या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल पडताळणी केली. निर्णय देताना न्यायालयाने ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितले आहे त्यामध्ये उपलब्ध नोंदीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही कृती किंवा चूक नाही, ज्यामुळे त्यावर पुन्हा पुनर्विचार करण्याची गरज भासेल, अशी टिप्पणी नोंदवली आहे. त्यानंतर कराडची पुनर्विलोकन याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा वाल्मीक कराड याला दणका दिला आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातून अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात सुदर्शन घुलेच्या शेतात नेले होते.
तिथे आरोपींनी संतोष देशमुख यांना लोखंडी रॉड, गॅस पाईपने बेदम मारहाण केली होती. त्यांचे हात-पाय तोडून त्यांना निर्दयीपणे ठार मारले होते. या प्रकरणात न्यायालयात तब्बल 1,800 पानांचे दोषारोपपत्र दाखल आहे. 12 मार्च 2025 रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली होती. या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह आठ आरोपींवर मकोका अंतर्गत खटला सुरू आहे. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.