Beed Politics News : आमदार धनंजय मुंडे हे गेल्या वर्षभरापासून राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्तेत असणारे नाव. आता त्यांची चर्चा राज्यभरात का झाली? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मराठा-ओबीसी आरक्षणाचा विषय, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जाती-जातीमध्ये निर्माण झालेली दरी आणि त्यातून धनंजय मुंडे यांचे झालेले राजकीय नुकसान हे सर्वांसमोर आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांनी अनेकदा खंतही व्यक्त केली आहे.
आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. या मकर संक्रांतीच्या निमित्ताने समाजा-समाजातील दरी, मतभेद, कटुता नष्ट होऊन सामाजिक सलोखा आणि सौहार्दाच्या तीळ-गुळाचे मिश्रण सर्वांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करो, अशा शब्दात त्यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा! तीळगुळ घ्या, गोड गोड बोला, असंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
धनंजय मुंडे हे सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतात. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. धनंजय मुंडे यांच्यासाठी गेले वर्ष हे राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही दृष्टीने खडतर गेले. मंत्रीपद गेले, प्रकृती बिघडली, राजकीय विरोधक प्रबळ झाले, पक्षानेही साथ सोडली. हत्येचा कट रचल्याचे आरोप झाले. या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करतानाच परळी मतदारसंघ, तेथील स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे राखण्याचे मोठे आव्हान मुंडे यांच्यासमोर होते.
हे आव्हान पेलण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या तडजोडी त्यांनी केल्या. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी परळीत भाजपसोबत (BJP) युती करत नगरपालिका राखली. पक्षाने स्टार प्रचारक म्हणून नेमले तरी त्यांच्या पायात बेड्या टाकल्या होत्या. परळी, गंगाखेड वगळता त्यांना मराठवाडा, महाराष्ट्रात कुठेही बाहेर पडू दिले नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्याशी असलेले त्यांचे संबंध आणि त्यावरून पक्षाची होणारी बदनामी टाळण्याचा यातून प्रयत्न झाला.
मराठा आरक्षणाचा लढा आणि मग त्याला ओबीसींकडून झालेला विरोध यापासून खऱ्या अर्थाने राज्यातील या दोन मोठ्या समाजात मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. आरक्षणाच्या या लढाईत मग दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप, टीका, बहिष्काराचे अस्त्र वापरले गेले. यातून राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील सामाजिक वातावरण बिघडले, लोक एकमेकांची जात विचारू लागले, अशी खंत धनंजय मुंडे यांनी वारंवार व्यक्त केली होती. यातूनच त्यांचे मंत्री पदही गेले. अजूनही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही असे, त्यांचे म्हणणे आहे.
राज्याच्या राजकारणात आपली पत आणि गत वैभव मिळवण्यासाठी धनंजय मुंडे धडपडत आहेत. भाजपशी त्यांची जवळीक वाढल्याच्या चर्चाही होत आहेत. अशावेळी मकरसंक्रांतीच्या शुभेच्छापर संदेशातून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. या मकर संक्रांतीच्या निमित्ताने समाजा-समाजातील दरी, मतभेद, कटुता नष्ट होऊन सामाजिक सलोखा आणि सौहार्दाच्या तीळ-गुळाचे मिश्रण सर्वांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.