

Beed News : बीड नगरपालिका आणि क्षीरसागर हे 40 वर्षांपासून अतुट समिकरण झाले आहे. अर्ध्या टर्मचा अपवाद वगळता स्वत: डॉ. भारतभूषण क्षीरसागर किंवा त्यांच्या मर्जीतला नगराध्यक्ष. पण, 28 वर्षानंतर प्रथमच बीड पालिकेचा नगराध्यक्ष क्षीरसागरांविना करण्याची राजकीय किमया आमदार विजयसिंह पंडित यांनी साधली. यामुळे बीड पालिकेच्या राजकारणात आणि पालिकेतही पंडितांची पहिल्यांदाच एंट्री झाली आहे. दरम्यान, क्षीरसागर भावंडांनी उपगनराध्यक्षपदासाठी एकत्र व्हावे, असा सुरही त्यांच्या चाहत्यांकडून आळविला जात आहे. दोघेही एकत्र येत पंडितांना चेक देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील हुकमी राजकारणी दिवंगत केशरकाकू क्षीरसागर लोकसभेत प्रतिनिधित्व करत. त्यांच्या वारसांमध्ये पहिल्यांदा जयदत्त क्षीरसागर यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून राजकीय एंट्री करुन मग कधी बीड तर कधी चौसाळा येथून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर पालिकेच्या राजकारणात आले आणि संघटनाच्या कौशल्यातून ‘अध्यक्ष’ अशी ओळख निर्माण केली. 1985 ला पहिल्यांदा नगराध्यक्ष झालेल्या डॉ. क्षीरसागरांचा सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा विक्रम आहे. 1985 पासून आजपर्यंत अर्धी टर्मचा अपवाद वगळता पालिकेवर त्यांचेच वर्चस्व होते.
पंडितांची प्रथमच बीड अन् पालिकेतही एंट्री
बीडला 60 वर्षांपासून घर असले तरी स्थानिक राजकारणात पंडितांचा कधीही थेट हस्तक्षेप नव्हता . त्यांना माणणाऱ्या शहरातील वर्गाला ते निवडणुकीत दिशा देत. मात्र, ऐनवेळच्या घडामोडींमुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर बीड नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा आली आणि पंडितांची बीडच्या राजकारणात एंट्री झाली. निकाल बाजूने लागल्याने आता पालिकेतही त्यांनी पाऊल ठेवले.
अपात्रतेमुळे रिंगणाबाहेर; शिवसेनेने फडकविला झेंडा
खालेक पेंटर यांच्या याचिकेवरुन डॉ. क्षीरसागरांना न्यायालयाने अपात्र केल्यामुळे एका टर्मला ते निवडणुकीबाहेर हेाते. याच महायुती सरकारच्या काळात माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांच्या नेतृत्वात शिवसेनेने चांगले यश मिळविले आणि भाजपच्या सोबतीने शिवलाल मुळूक व स्मिता धुत नगराध्यक्ष झाल्या. पण, या दोन वर्षांनंतर पुढे सहकारी सय्यद सलिम, स्वत: डॉ. क्षीरसागर, सहकारी श्रीमती दुधाळ व त्यांच्या पत्नी डॉ. दिपा क्षीरसागर नगराध्यक्ष राहील्या. आता २८ वर्षांनंतर प्रथमच क्षीरसागरांविना बीडचा नगराध्यक्ष झाला.
भावंडांच्या एकत्रिकरणावर समर्थकांचा खल
गेल्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी काका डॉ. क्षीरसागरांना आव्हान दिल्यानंतर ते स्वत: नगराध्यक्ष व हेमंत क्षीरसागर उपनगराध्यक्ष झाले. या निवडणुकीत क्षीरसागरांच्या नेतृत्वाबाहेरील नगराध्यक्ष करण्यात विजयसिंह पंडितांना यश आले. आता उपनगराध्यक्षपदासाठीची मोर्चेबांधणी सुरु आहे. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे 12 आणि शिवसेनेचा एक असे 13 तर डॉ. योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 15 असे 28 नगरसेवक आहेत. तर, विजयसिंह पंडितांकडे राष्ट्रवादीचे 19, शिवसेनेचे तीन तसेच कॉंग्रेस व एमआयएमचा प्रत्येकी एक असे 24 नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे संख्याबळ आहे.
क्षीरसागर भावंडांचे संख्याबळ अधिक असल्याने ‘राजकारणात अशक्य काहीच नाही’ या तत्वाने उपनगराध्यक्ष व विषय समित्यांसाठी भावंडांनी एक यावे, भलेही एखाद्याने बाहेरुन पाठींबा देत पंडितांना शह द्यावा, अशी क्षीरसागर चाहत्यांची भावना आहे. आता आमदार क्षीरसागरांनी अजित पवारांची पुण्यात भेट घेतल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल संभ्रम वाढला आहे. त्यामुळे घडामोडींकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.