Ajit Pawar, suresh Birajdar  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv bank: धाराशिव जिल्हा बँकेची वरात, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दारात

सरकारनामा ब्युरो

शितल वाघमारे

Dharashiv News : होमट्रेड घोटाळ्यानंतर मान टाकलेल्या धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अद्यापपर्यंत उभारी मिळालेली नाही. होमट्रेड घोटाळ्यात अडकलेली 30 कोटी रुपयांची रक्कम राज्य सहकारी बँकेकडे पडून आहे. 2016 पर्यंत त्यावरील व्याज नागपूर जिल्हा बँकेने गिळंकृत केले. त्यानंतर जिल्हा बँकेला जाग आली. पुढील व्याज वाचले. आता गिळंकृत केलेले व्याज आणि बँकेत जमा असलेले व्याज, आणि जप्त केलेली 30 कोटींची रक्कम, असे सगळे मिळून 70 कोटींपेक्षा अधिक रुपयांची रक्कम जिल्हा बँकेला मिळावी, अशी विनंती जिल्हा बँकेने सर्वोच्च न्यायालयात केली होती.

उच्च न्यायालयाने निर्धारित वेळेत निकाल देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. तत्पूर्वी, राज्य शासनाकडे थकित असलेली रक्कम मिळावी म्हणून 'डीसीसी'ची वरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दारात पोहोचली आहे.

प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तेरणा, तुळजाभवानी आणि जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आगपाखड होते. रोखे घोटाळा, त्यानंतर तेरणा आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारकडे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी जिल्हा बँकेला थकहमी आणि भागभांडवलापोटी मिळणार्‍या मदतीसाठी प्रस्ताव दाखल केला होता.

जिल्हा बँक गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी कारखान्यांची थकहमी रक्कम, भागभांडवलापोटीची रक्कम मिळण्यासाठी संचालक मंडळाचे वारंवार अजित पवार यांची भेट घेतली होती. यासाठी तत्कालीन सहकार सचिव देवरा यांच्या अध्यक्षतेखाली माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार व सहकार आयुक्त यांच्यात बैठक होऊन बँकेस मदत करण्यासाठीचा सकारात्मक अहवाल अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. मात्र, याच कालावधीत राज्यात राजकीय घडामोडी होऊन महविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले आणि बँकेला मदत मिळण्याची आशा धूसर झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील सरकार बदलले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार यांची विचारधारा आणि उद्योगप्रिय असलेले मातब्बर नेते त्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांच्या माध्यमातून पुन्हा सुरू केले. त्याचबरोबर जिल्हा बँकेचा मुद्दाही आजी-माजी संचालक मंडळाला आठवला.

आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला फटका बसू नये यासाठी बँकेचे विद्यमान अध्यक्ष, काँग्रेसचे नेते बापूराव पाटील आणि माजी अध्यक्ष तथा अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून धाराशिव मतदारसंघातून खासदारकीसाठी पुढे आलेला चेहरा म्हणजे सुरेश बिराजदार (Suresh Birajdar) यांनी बँकेच्या भल्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारकडे बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठीचा प्रस्ताव पूर्वीपासूनच पडून आहे, ज्या स्थितीत दाखल केला, तशाच स्थितीत असलेल्या प्रस्तावावरील धूळ आता निघणार आहे.

माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार आणि विद्यमान अध्यक्ष बापूराव पाटील यांनी काही संचालकांसह 29 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बँकेचे हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तानाजी सावंत यांना भेटून मदतीसाठी विनंती करणार आहे. बँक अडचणीतून बाहेर येणे महत्त्वाचे असून याबाबत सकारात्मक निर्णय होईल की नाही? हे सरकारच्या मेहेरबानीवरच अवलंबून आहे.

(Edited By - Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT