Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसापासून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून सहलीवर असलेले जिल्हा परिषद सदस्य दोन दिवसापासून मतदारसंघात परतले आहेत. त्यातच मुंबईत एकनाथ शिंदेंच्या दरबारी महायुतीच्या वादावर तोडगा निघाला आहे. या बैठकीला पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहसंपर्कप्रमुख राजन साळवी उपस्थित होते.
त्यावेळी धाराशिव झेडपीचा अध्यक्ष हा महायुतीचा होणार असल्याचे ठरले. यापुढील सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरविण्याचे अधिकार शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे असणार आहेत तर भाजपकडून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. तर दुसरीकडे भूम-परंड्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत मात्र, या चर्चेच्या फ्रेममध्ये कुठेच नसल्याने त्यांचे पंख छाटले असल्याची चर्चा रंगली आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला बहुमत मिळाले आहे. भाजपचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15 असे एकूण 40 व तीन अपक्ष असे 43 संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे बहुमत होत आहे. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे 15 सदस्य निवडून असले असले तरी यामधील आठ जण तानाजी सावंत गटाचे आहेत तर उर्वरित सात पैकी तीन ज्ञानराज चौगुले, रवींद्र गायकवाड यांच्या गटाचे आहेत तर उर्वरित चार जण शिवसेनेचे निष्ठवंत आहेत. त्यामुळेच या आठ सदस्यांच्या जोरावरच तानाजी सावंत यांचा सुरुवातीपासून भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासोबत जाण्यास विरोध आहे.
दुसरीकडे शिंदे सेनेच्या उर्वरित सात सदस्य घेऊन चौगुले, गायकवाड भाजपसोबत जाण्यास आग्रही आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना याठिकाणी निर्णय घेताना अडचण येत होती. तर दुसरीकडे भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यासोबत शिंदे शिवसेनेचे दोन निवडून आलेले सदस्य सहलीवर गेले होते. त्यामुळे संख्याबळ कमी झाले होते. मात्र, शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले दोन सदस्य पुर्वश्रमीचे भाजपचे होते. त्यांना भाजपसोबत येण्याच्या अटीवरच शिवसेनेची उमेदवारी दिली होती. त्यामुळेच मतमोजणी झाल्यानंतर ते लगेच भाजपच्या गोटात गेले होते. त्यामुळे शिवसेना सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरवताना बॅकफूटवर गेली होती.
गेल्या दोन दिवसातील घडामोडी पाहता परत एकदा भाजप व शिंदेच्या शिवसेनेत सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरणार आहे. त्यानुसार धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला असू शकतो. सुरुवातीचे सव्वावर्ष भाजपचा अध्यक्ष तर शिवसेनेचा उपाध्यक्ष राहणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक, शिवसेनेला दोन तर भाजपला दोन सभापतीपद मिळू शकतात. भाजप व शिवसेना त्यांच्या कोट्यातील एक-एक सभापतिपद अपक्ष सदस्याला देऊ शकतात, असे सध्या तरी दिसते. या फॉर्म्युल्यावर स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यास पुन्हा मुंबईत भाजप, शिवसेनेचे हायकमांड निर्णय घेणार आहे.
दुसरीकडे या सर्व घटना घडामोडीत माजी मंत्री तानाजी सावंत यांची अडचण झाली आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना विरोध केला. त्यामुळे आता भाजपसोबत सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यांची अडचण झाली आहे. नेमका त्याचा फायदा शिंदे शिवसेनेतील ज्ञानराज चौगुले, रवींद्र गायकवाड यांना झाला आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदेंच्या शिवसेनेची सर्व सूत्रे चौगुले, गायकवाड यांच्या हाती येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे तानाजी सावंत यांचे पुतणे हे देखील अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते सुरुवातीपासूनच भाजपसोबत आहेत. दुसरीकडे तानाजी सावंत यांचे उमरग्यातील शिवसेना नेत्याशी फारसे सख्य राहिलेले नाही. त्यामुळे सावंत यांच्या हाती आता काय लागणार याची उत्सुकता लागली आहे. सावंत सत्तास्थपनेच्या चर्चेपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे त्यांना सत्तेत मानाचे पान मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी सावंतांचे पंख छाटले असल्याची चर्चा मात्र जोरात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.