Latur Congress Sarkarnama
मराठवाडा

Congress Vs BJP : भाजपचे 'अच्छे दिन' फक्त टीव्हीवरच, लातूरला चांगले दिवस आमच्यामुळे; देशमुखांनी डागली तोफ

राम काळगे

Latur Political News : सध्या देश अराजकतेच्या परिस्थितीमधून जात आहे. दहा वर्षापूर्वी देशाला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत भाजपला सत्ता मिळाली. पण त्यांचे अच्छे दिन फक्त टीव्हीवर दिसतात. लातूर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले ते मांजरा परिवारामुळे, असा दावा करत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भाजपला टोला लगावला.

औसा तालुक्यातील भादा येथे आयोजित सभेत देशमुख यांनी भाजपवर हल्ला चढवला. देशाचा कारभार पाहिला तर हुकूमशहा पद्धतीने सुरू आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, शेतीमालाला भाव नाही, महागाई वाढवली, पेट्रोल- डिझेल, गॅस दरवाढ झाल्याने महागाई भडकली आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत, युवकांना रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे अशा लोकांच्या हातात पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल देशमुख यांनी केला.

सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने दहा वर्षांत काय केले? पुढे काय करणार हे सांगत नाहीत, त्यांचे अच्छे दिन फक्त टीव्हीवरच्या जाहिरातीत दिसतात. आम्ही मांजरा साखर परिवाराच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याला चांगले दिवस आणले आहेत. सुरुवातीला चौदाशे रुपये भाव देत आता आम्ही 2800 रुपयांपर्यंत भाव देवून जिल्ह्यातील शेतकरी सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न केला, असेही देशमुख म्हणाले.

मांजरा परिवाराच्या माध्यमातून चांगले दिवस प्रत्यक्षात आपण अनुभवता येत आहेत. याला कल्याणकारी काम म्हणतात. सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या काळात कुठलाच घटक मागच्या दहा वर्षांत समाधानी नाही. अशा फसव्या भाजपा सरकारला धडा शिकवला पाहिजे व उद्याच्या लोकसभा निवडणुकीत उच्चविभूषित काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांना विजयी करावे, असे आवाहन दिलीपराव देशमुख यांनी केले.

सध्या जो सत्ताधारी पक्षाकडून चारसौ पार चा नारा सुरू आहे तो संविधान बदलण्यासाठीचा प्रयत्न आहे. अशावेळी सर्वधर्म समभाव, सर्वांना सोबत घेवून देश एकसंघ ठेवण्याचे काम, देशासाठी बलिदान देणारे नेते काँग्रेसमध्ये होऊन गेले. अशा काँगेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे आपल्या भागात चांगले कार्य करीत आहेत. या भागातील 27 गावात अधिक मताधिक्य मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, निश्चितपणे विकासकामे होतील. डॉ. शिवाजी काळगे यांना आशिर्वाद द्या, असेही दिलीपराव देशमुख यांनी उपस्थितांना आवाहन केले.

शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा मिळत नाही, शेतीमालाला भाव नाही, नुकसान भरपाई नाही. सत्ताधारी भाजपने लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. नुसत्या घोषणा केल्या प्रत्यक्षात कुठलीच मदत मिळाली नाही. विकासाच्या गप्पा मारत जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपा सरकारला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन आमदार धिरज देशमुख यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT