Aurangabad Loksabha News
Aurangabad Loksabha News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad News: नेत्यांचे काय ठरले माहित नाही ? पण शिंदे समर्थकांचा मतदारसंघावर दावा..

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने मिशन ४५ संकल्प अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत युतीमुळे (Bjp) भाजपने न लढवलेल्या मतदारसंघात पक्षाकडून जोर लावण्यात येणार आहे. यापैकीच मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली व उस्मानाबाद हे चार मतदारसंघ आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची औरंगाबादेत (Aurangabad) जाहीर सभा देखील झाली. ती सभा फसली असली तरी भाजप एवढ्याने मागे हटणारा पक्ष नाही. राज्यातील सत्तातंराच्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व भाजपच्या दिल्ली व राज्यातील नेत्यांसोबत काय वाटाघाटी झाल्या? हे गुलदस्त्यात आहे. पण ज्या पद्धतीने भाजपने वर्षभराआधाची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे, ते पाहता शिंदेसेनेमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

मराठवाड्यातील आठ पैकी हिंगोली, परभणी, उस्मानाबाद हे तीन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. यापैकी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील शिंदे गटासोबत गेले आहेत. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला होता. मराठवाड्याची राजधानी म्हणून हा मतदारसंघ महत्वाचा आहे. शिवाय या मतदारसंघावर शिवसेनेची मजबुत पकड गेल्या कित्येक वर्षांपासून कायम होती.

त्यामुळे शिंदेसेनेसाठी इथे निवडणूक लढवणे इतर मतदारसंघाच्या तुलनेत सोपे जावू शकते. मात्र इथे भाजपने तयारी सुरू केल्यामुळे शिंदेसेनेच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये चिलबिचल सुरू झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आम्ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही राहणार आहोत, असे म्हटले आहे. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील तेच होणार असले तरी स्थानिक नेत्यांची मात्र औरंगाबादची जागा आपल्याला मिळावी, अशी इच्छा आहे.

शिंदेसेनेकडून विद्यमान रोहयोमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे उमेदवार असू शकतात. भुमरे पैठणमधून पाचवेळा तर शिरसाट तीनवेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेशी दोन हात करायचे झाल्यास यापैकी एक उमेदवार चांगली लढत देवू शकतो. भाजपकडे सध्यातरी डाॅ. कराड यांच्याशिवाय दुसरे नाव नाही.

शहरी भागात भाजपचे वर्चस्व असले तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजप दोन्ही सेनेच्या तुलनेत कुमकूवत आहे. आतापर्यंतचा जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहिला तर इथला मतदार हा हिंदुत्ववादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. गेल्या ३० वर्षात चंद्रकांत खैरे स्वतः चारवेळा, प्रदीप जैस्वाल, मोरेश्वर सावे हे प्रत्येकी एकदा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे भाजप किंवा शिंदेसेनेचा उमेदवार असला तरी त्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कडवे आव्हान असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT