Jayant Patil News, Aurangabad
Jayant Patil News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil News : आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे आज बहुजनांची मुलं विदेशात शिकतायेत..

सरकारनामा ब्युरो

Ncp : राज्यात गेल्या अडीच वर्षात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे आणि त्यापुर्वी १०-१५ वर्षात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या सरकारने घेतलेल्या अनेक क्रांतीकारी निर्णयांमुळे आज बहुजनांची मुलं विदेशात शिकतायेत, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. राज्यातून महाविकास आघाडी सरकार गेल्याचा सर्वाधिक फटका शिकलेल्या तरुणांना बसला, असेही जयंत पाटील म्हणाले.

मराठवाडा (Marathwada) शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांचे लातूर, बीड (Beed) जिल्ह्यात मेळावे झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी आघाडी सरकारच्या काळात बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देत विक्रम काळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता आले. राष्ट्रवादी व काॅंग्रेस आघाडीच्या सरकारने गेल्या १०-१५ वर्षात जे क्रांतीकारी निर्णय घेतले त्यामुळे गरीब घरातील मुलं शिकून मोठी झाली, परदेशात शिकायला गेली. आमचे दिलीप वळसे पाटील जेव्हा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते तेव्हा राज्यात अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले.

इंजिनिअरिंग काॅलेजच्या माध्यमातून तरुणांना शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या. आदिवासी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या फीस भरण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. कायम विनाअनुदानित शब्द काढून शिक्षकांना अनुदान सुरू करण्याचा निर्णय देखील महत्वाचा होता. राज्यात सत्ता बदल झाल्याचा मोठा फटका शिकलेल्या तरुणांना बसला, राज्यातील अनेक मोठे उद्योग शिंदे-फडवीस सरकारच्या काळात गेले, अशी टीकाही पाटील यांनी केली.

विक्रम काळे यांनी विधान परिषदेत कायम शिक्षकांचे प्रश्न धडाडीने मांडले, दोन मिनिटात कधीच त्यांचे मुद्दे संपत नसायचे, ते सविस्तर चर्चा करून मंत्री त्यावर समाधानकारक उत्तर देत नाही, तोपर्यंत बोलत रहायचे. काही मिनिटात सुटणार प्रश्न पण तो सुटेपर्यंत तीन-तीन तास संबंधित मंत्र्यांकडे बसून ते मार्गी लावूनच बाहेर पडण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.

त्यांचे वडील स्व. वसंतराव काळे यांनी शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्यानंतर त्यांचे कार्यपुढे तसेच सुरू ठेवत शिक्षकांचा विश्वास संपादन करण्याचे मोठे काम काळे यांनी केले. सातत्याने शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न काळे आणि चव्हाण सोडवत असल्यामुळेच मतदार त्यांना वारंवार संधी देतात. यावेळी काळेंचा विजय मोठा कसा होईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT