Mumbai News : राज्यातील रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून तीन पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतरही विधानपरिषदेच्या जागवाटपाबाबत तोडगा निघाला नाही. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बालभवनचे उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमालाही एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या बालभवन इमारतीचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण आणि बालकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमास एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपावरून नाराज असलेल्या शिंदे यांनी या कार्यक्रमास हजर न राहता नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा रंगली आहे.
विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होऊन आठ दिवस झाले आहेत. त्यानंतर महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. प्राथमिक चर्चेनंतर महायुतीचा फॉर्म्युलाही ठरला होता. मात्र काही जागासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे. शिंदे सेनेकडून विधानपरिषदेच्या ७ जागांवर दावा करण्यात आला आहे. भाजप मात्र ४ जागा सोडण्याबाबत सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच शिंदे यांनी दोन दिवसापूर्वीच दिल्ली दरबारी जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. मात्र दिल्लीवारीनंतरही विधानपरिषदेबाबत तोडगा निघाला नाही.
महायुतीमध्ये यापूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या आग्रहानंतर आणखी एक जागा वाढविण्यात आली असल्याचे समजते. शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून ठाणे, नाशिक, यवतमाळ या जागा पूर्वी ठरल्याप्रमाणे देण्यात येणार आहे. तर ठाणे-पालघर, छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यामुळे या दोन जागेच्या बदल्यात सेनेला परभणी-हिंगोलीची जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. तर त्यासोबतच पुण्यावर भाजपकडून आपला दावा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जागावाटपाचा हा तिढा कायम आहे. तर दुसरीकडे जागावाटपात अपेक्षित जागा मिळत नसल्याने शिंदे नाराज असल्याचे समजते.
महायुतीचे जागावाटप फायनल शिक्कामोर्तब करण्यासाठी आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक पार पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या बैठकीतीच अंतिम निर्णय तिन्ही नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.