Girish Mahajan Visit Affected Farm News, Latur
Girish Mahajan Visit Affected Farm News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Girish Mahajan News : दोन दिवसांत पंचनामे, अहवाल येताच भरीव मदतीची ग्वाही..

सरकारनामा ब्युरो

Latur : जिल्ह्यात १७ व १८ मार्च रोजी अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज दिले. लातूर जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री महाजन आज तातडीने लातूरमध्ये दाखल झाले. त्यांनी नुकसानीचा आढावा घेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे, त्यामुळे भरीव मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. (Latur) या अस्मानी संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तातडीने मदत देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. (Affected Farmers) अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात ज्वारी, हरभरा सारख्या पिकांसह आंबा, द्राक्ष फळबागांचेही नुकसान झाले आहे.

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना महाजन यांनी आढावा बैठकीत दिल्या. लातूर जिल्ह्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा उल्लेख करून लातूर शहरात नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत खासदार सुधाकर शृंगारे यांनी सूचना केल्या.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचमाने करताना ते अधिकाधिक वस्तुनिष्ठ व अचूक होतील, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी आमदार रमेश कराड यांनी केली. औसा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला असून द्राक्षे बागा, ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगत आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी केली.

१७ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने देवणी तालुक्यात एक हजार 67 हेक्टर, अहमदपूर तालुक्यात आठ हेक्टर आणि जळकोट तालुक्यात सव्वाचार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच १८ मार्च रोजी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील शेतपिकांचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असला तरी शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी सहकार्य करणार आहेत, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

जिल्ह्यात शुक्रवारी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत आढावा घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी थेट बांधावर जावून पाहणी केली. रेणापूर तालुक्यातील रामवाडी येथील पंढरी उगिले यांच्या शेतातील आंब्याच्या बागेचे गारपिटीने झालेले नुकसान त्यांनी पाहिले. तसेच पानगाव फाटा येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून याबाबत अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. या नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांची पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT