एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील पुन्हा आपल्या जुन्या पत्रकारितेच्या भूमिकेत परतण्याची तयारी करत आहेत.
त्यांनी स्वतःचं यू ट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ते स्थानिक ते राज्यस्तरावरील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि मीडियामध्येही चर्चा रंगली आहे.
AIMIM News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार आणि त्यानंतर पाच वर्षे खासदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द गाजवली. टीव्ही चॅनेलचे पत्रकार ते आमदार, खासदार हा त्यांचा प्रवास चित्रपटातील कथेला शोभून दिसावा असा होता. एमआयएम सारख्या पक्षाकडून थेट विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या प्रचारात शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षाला मात देत इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमध्ये एमआयएमचा झेंडा पहिल्यांदाच फडकवला.
परंतु 2024 मध्ये लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसा निवडणुकीत इम्तियाज यांचा पतंग कटला. त्यामुळे ते आता पुन्हा आपल्या जुन्या भूमिकेत म्हणजेच पत्रकारितेकडे वळत आहेत. इम्तियाज जलील आॅफिशियल या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते सत्ताधारी पक्ष, त्यांचे नेते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गैरकारभार भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहेत. या संदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरूनच घोषणा केली आहे. त्यामुळे ते पुन्हा आपल्या जुन्या कामात मन रमवून सलग दोन पराभवामुळे मिळालेला वेळ कारणी लावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अनेक वर्षे पत्रकारितेत घालवल्यामुळे अभ्यासपूर्ण मांडणी, आक्रमक नेतृत्व आणि थेट रस्त्यावर उतरून सत्ताधारी, प्रशासनाला अंगावर घेण्याची कार्यपद्धती यामुळे इम्तियाज जलील यांचा छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचे सलग चार टर्म खासदार असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी थेट दिल्लीत धडक दिली. जिल्ह्याचे प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडत त्यांनी केवळ मुस्लिमच नाही तर इतर धर्मीयांची मनेही जिंकली.
परंतु 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 2019 मध्ये लोकसभेत जो चमत्कार इम्तियाज जलील यांना घडवता आला तो 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना करता आला नाही. संभाजीनगरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि मंत्री अतुल सावे यांना इम्तियाज जलील यांनी कडवी झुंज दिली. मात्र 1700 मतांनी इम्तियाज जलील यांचा पतंग कटला. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात जाणवला.
मराठवाड्यातील आठ पैकी छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीच्या संदिपान भुमरे यांनी जिंकली. इथे त्यांची लढत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याशी झाली. सलग दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही गेल्या वर्षभरापासून इम्तियाज जलील आक्रमकपणे सत्ताधारी पक्षांवर तुटून पडताना दिसले. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैर व्यवहाराचे आरोप करत इम्तियाज यांनी खळबळ उडवून दिली. परंतु त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश काही आले नाही. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मोठी जबाबदारी खांद्यावर असलेले इम्तियाज जलील सध्या छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत.
कुठल्याही पक्षाशी युती नाही, महाविकास आघाडी एमआयएमला सोबत घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीत स्वबळावर मैदानात उतरण्याची घोषणा इम्तियाज यांनी केली आहे. महानगरपालिकेत विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिलेल्या एमआयएमने यावेळी मात्र थेट महापौर पदावर दावा सांगितला आहे. त्यांच्या या दाव्याचा पतंग उंच उडतो की गोते खातो? हे येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल. परंतु सलग दोन वेळा पराभूत झाल्यानंतर इम्तियाज जलील हे आता पुन्हा आपल्या जुन्या भूमिकेकडे वळताना दिसत आहेत.
माध्यमांवर खापर
प्रसार माध्यम लोकांना हवे ते दाखवत नाही, जे नको ते दाखवतात, लपवाछपवी करतात असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी स्वतःचे यूट्यूब चैनल तयार करून जनतेपासून लपवल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी या माध्यमातून समोर आणणार असल्याचे म्हटले आहे. ऑफिशियल इम्तियाज जलील या नावाने हे चॅनल सुरू करण्याची घोषणा करत वक्त बोर्डासह महापालिका, बांधकाम विभाग, सिंचन, रस्ते विकास अशा सगळ्याच विभागातील गैरकारभाराचा व राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड आपण करणार असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे. एकूण काय तर इम्तियाज जलील आता आपल्या जुन्या भूमिकेत रमण्याच्या विचारात असून असलेला वेळ कारणी लावणार आहेत.
1. इम्तियाज जलील कोण आहेत?
→ ते एमआयएमचे माजी खासदार असून, राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते.
2. ते कोणतं चॅनल सुरू करणार आहेत?
→ त्यांनी स्वतःचं यू ट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे; इम्तियाज जलील आॅफिशियल नावाने.
3. हे चॅनल कुठून सुरू होणार आहे?
→ हे चॅनल औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथून सुरू होणार आहे.
4. त्यांचा उद्देश काय आहे?
→ समाजातील वास्तव दाखवणे, राजकारणातील पारदर्शकता वाढवणे आणि जनतेचा आवाज पोहोचवणे हा त्यांचा उद्देश आहे.
5. राजकीय क्षेत्रात याचा काय परिणाम होईल?
→ त्यांच्या मीडिया पुनरागमनामुळे स्थानिक आणि राज्यस्तरावरील राजकीय समीकरणांवर नवा प्रभाव पडू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.