Rajesh Tope SARKARNAMA
मराठवाडा

Ghansawangi Vidhansabha Election 2024: राजेश टोपेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी महायुती लागली कामाला; इच्छुकांमध्ये चुरस

सरकारनामा ब्यूरो

जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा मराठवाड्यातील बालेकिल्ला म्हणून घनसावंगीकडे पाहिले जाते. १९९९ पासून माजी मंत्री राजेश टोपे हे याठिकाणाहून निवडून येत आहेत.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.घनसावंगी मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांना कडवी झुंज दिली होती. आगामी विधानसभेसाठी त्यांना महाविकास आघाडीत जागा मिळण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.

त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे . त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार आहे. शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आपल्याच तिकीट मिळेल, असा दावा केला आहे. लवकरच ते 25 हजार कार्यकर्त्यांसह ते शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत.

महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीतही उमेदवारीसाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. कोणाला उमेदवारी मिळणार, कोण बंडखोरी करणार? हे येत्या काही दिवसात समजेल. सध्या महायुतीत तिन्ही घटक पक्षांच्या वतीने उमेदवारी कायम राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यातून आपआपल्या समर्थकांकडून पक्षांच्या भूमिका व बाजू जोरदारपणे मांडण्यात येत आहेत.

भाजपचे सतीश घाटगे यांनी तिकीट मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते मतदारसंघात नागरिकांच्या संपर्कात आहेत. महायुतीच्या सरकारच्या काळात ४८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहे.

समृद्धी साखर कारखान्याच्या माध्यमातून ३०० किलोमीटर पाणंद रस्त्यांची कामे केली आहे. अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका यांच्या मुलीच्या लग्नास २१ हजार रुपये कन्यादान योजना, सभासदांना एक क्विंटल साखर अशा अनेक योजना राबवल्या. मतदान केंद्रनिहाय बूथ रचना, शाखा कार्यकर्त्याची बांधणी केली आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

1999 पासून ते आजवर सलग विजय मिळवत राजेश टोपे यांनी या मतदारसंघात एकछत्री अंमल प्रस्थापित केला आहे. दोन सहकारी साखर कारखाने, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील जाळ्यामुळे राजेश टोपे यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे.

राजेश टोपे यांचे वडील स्व.अंकुशराव टोपे हेही 1972 मध्ये काँग्रेस उमेदवार अण्णासाहेब उढाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून विधानसभेवर निवडून आले होते. 1991 ला अंकुशराव टोपे हे काँग्रेसच्या तिकिटावर जालना लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाले आणि तेव्हा पासून टोपे पिता-पुत्रांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड बसली. आता राजेश टोपे यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी महायुती डाव टाकणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT