Beed Political News Sarkarnama
मराठवाडा

BJP is the obstacle : शासन नको बीड जिल्ह्याच्या दारी; भाजपकडूनच स्पीड ब्रेकर...

Datta Deshmukh

Beed Political News : अगोदर शिवसेना आग्रह आणि आता राष्ट्रवादीच्या अट्टहासाने बीडहून परळीत नियोजित झालेल्या `शासन आपल्या दारी` या बहुचर्चित उपक्रमाला जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीच `स्पीड ब्रेकर` लावला आहे. (BJP Politics News) कार्यक्रमावरील राष्ट्रवादीचा पगडा आणि कार्यक्रमाच्या नावाखाली होणारी अवाजवी उधळपट्टी यामुळे जनमाणसांत सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची कैफियत जिल्ह्यातील भाजपजनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानी घातली. त्यामुळे संभाव्य २० सप्टेंबर ही तारीख तर लांबली असून, आता कार्यक्रम रद्द होणार का? हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, परळीत होणाऱ्या संभाव्य 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी तीन दिवसांच्या मंडप उभारण्यासाठी तब्बल दोन कोटी २१ लाख ९० हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. (Beed News) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत निविदादेखील मागविल्या आहेत. या अवाजवी खर्चाची सध्या नेटकरी व विरोधी पक्षाकडून खिल्ली उडवली जात आहे, याचाही संदर्भ भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) कानी घातली आहे.

अगोदर शिवसेना - भाजपचे सरकार असताना 'शासन आपल्या दारी' उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला शिवसेना यासाठी आग्रही होती. (BJP) मात्र, या उपक्रमासाठी मंडप, जेवण, लोकांना आणणे यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कोठून उभारायचा, असा पेच जिल्हा प्रशासनासमोर होता. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून या कार्यक्रमास नकार घंटा कळविली जात होती. दरम्यान, सत्तेत पुन्हा राष्ट्रवादीची एंट्री झाली. या कार्यक्रमासाठी मंडप, जेवण व लोकांना आणण्यासाठीच्या खर्चाचे नियोजनही करण्यात आले.

परंतु, बीडला ऑगस्ट महिन्यात निश्चित झालेल्या या कार्यक्रमाची तारीख वाढवून पुन्हा १६ सप्टेंबर ठरली. मात्र, हा मुहूर्तदेखील पुढे ढकलला असून, जिल्ह्याच्या मुख्यालयी होणारा हा उपक्रम परळीत करण्याचे निश्चित झाले. ता. १९ ते २२ या चार दिवसांतील एका दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत परळीत कार्यक्रम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली.

परळीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी शामियाना (मंडप) उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंत्यांनी सव्वा दोन कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे. याबाबत टीकास्त्र सुरू झाले आहे. नेटकरी व विरोधक तर तुटून पडलेच आहेत. शिवाय सत्तेतील भाजपनेही अंतर्गत या उपक्रमाबाबत नकार घंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे.

तसेच, मुळात कृषिमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची सत्तेत एंट्री झाल्यामुळेच जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीडहून हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम परळीला हलला आहे. आता होणाऱ्या कार्यक्रमावर पूर्णपणे धनंजय मुंडे यांचाच वरचष्मा राहणार आहे. त्यामुळे भाजप या कार्यक्रमात अगदीच दुय्यम असल्याची सलही नेत्यांत आहे. त्यामुळे कार्यक्रमच रद्द करा, असा आग्रह भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला आहे.

यापूर्वी तालुका पातळीवर आमदार सुरेश धस यांनी आष्टी, आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई व आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईत हे कार्यक्रम केले आहेत. त्यामुळे आता कार्यक्रमच नको, असा अट्टहास धरला जात आहे. दरम्यान, ता. २० सप्टेंबरपर्यंत अपेक्षित कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली आहे. एकूण कार्यक्रमासाठी पाच कोटींहून अधिक शासकीय निधी खर्च होणार आहे. आता भाजप नेत्यांच्या आग्रहानुसार देवेंद्र फडणवीस कार्यक्रम रद्द करतात का हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT