Congress News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढायचे की आघाडीत? याचा सर्वस्वी निर्णय हा स्थानिक परिस्थिती पाहून तिथल्याच नेत्यांनी घ्यायचा आहे, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. यानंतर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. आघाडी संदर्भात राज्य पातळीवर कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका नगर परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी महत्वाची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आघाडी संदर्भात कुठलाही निर्णय हा राज्य पातळीवरून होणार नाही, याचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी शहर, तालुका, जिल्हा पातळीवर चर्चा करून जर एकमत झाले, तर स्थानिक स्तरावर आघाडी करता येईल, असे सपकाळ म्हणाले.
या घोषणेनंतर काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, आता कार्यकर्त्यांनाही ‘अच्छे दिन’ येणार असल्याची चर्चा रंगली. मराठवाडा विभागीय काँग्रेस बैठकीसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख, विश्वजीत कदम, मधुकर चव्हाण, खासदार डॉ. कल्याण काळे, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी व चार जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप हा लोकशाहीविरोधी असून संविधान बदलण्याच्या दिशेने ते पुढे जात आहेत. त्यामुळेच आघाड्यांची गरज भासते, मात्र आघाडी केल्यावर कुठेतरी पक्षालाही किंमत चुकवावी लागते. काँग्रेस मात्र स्थानिक निवडणुकींत आपले कार्यकर्ते संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सपकाळ यांनी सांगीतले. 'लाडकी बहीण' योजनेत महिलांची फसवणूक झाली आहे. जाहीर केल्याप्रमाणे तीन हजाराऐवजी केवळ दीड हजार रुपयेच महिलांना दिले जात आहेत.
शिवाय बोगस अर्ज मंजूर करून काहींना अन्यायकारकरीत्या लाभ दिला गेला. अशा लाभार्थ्यांना वाटप झालेली रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मत चोरी, फसवी आश्वासने आणि जनतेचा विश्वास घात राज्यातील महायुती सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका कायम स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी जातीनिहाय जनगणना तातडीने करून, त्याच्या आधारे मराठा समाजाला न्याय द्यावा, असे मत सपकाळ यांनी व्यक्त केल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.