Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant On Eknath Shinde : तानाजी सावंतांच्या मनात नेमकं काय चाललंय? थेट मुख्यमंत्री शिंदेंवरच निशाणा

Maharashtra Politics : नांदेड घटनेतून सुटका झाली तरी निवडणुकीत सावंतांची कसोटी लागणार

अय्यूब कादरी

Dharashiv Political News : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील मृतांचा आकडा सहा दिवसांत ६२ वर गेला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांतही अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डॅाक्टरांची कमतरता, औषधे, उपकरणांचा तुटवडा, खाटांची कमी संख्या आदी कारणे समोर आली आहेत. पहिल्या दिवसापासून यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

आता राज्याचे आरोग्यमंत्री, शिवसेनेचे नेते (शिंदे गट) डॉ. तानाजी सावंत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. या मृत्यूंसाठी राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार आहे, असे धक्कादायक विधान त्यांनी नाशिक येथे केले आहे. त्यांच्या निशाण्यावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आले आहेत. सावंत यांच्या वक्तव्यानंतर आता विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे आरोग्यमंत्री सावंतांच्या मनात नेमके काय सुरू आहे, याची चर्चा राज्यात आहे. (Latest Political News)

सावंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये मंत्री होते. २०१९ नंतर शिवसेना-भाजपचे बिनसले आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात मात्र सावंत यांना स्थान मिळाले नाही. राष्ट्रवादीने त्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला आक्षेप घेतला होता, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती.

मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे सावंत यांचे (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंशी बिनसले. कालांतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी सावंतांनी शिवसेनेचे अनेक आमदार शिंदेंच्या पाठीशी यावेत, यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. या मंत्रिमंडळात सावंतांना मोठे खाते मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आरोग्यमंत्रिपद देऊन त्यांची बोळवण केली. धाराशिवचे पालकमंत्रिपदही त्यांना मिळाले.

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे दिग्गज नेते आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून मध्यंतरी त्यांचा राणाजगजिसिंह पाटील यांच्याशी वाद झाला. सावंतांनी सर्वाधिक निधी आपल्या भूम-परंडा मतदारसंघात नेला होता. त्याला पाटलांनी आक्षेप घेत मुख्य सचिवांकडे तक्रार केली. त्यामुळे निधीचे फेरवाटप करावे लागले. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार पाटील यांच्या पाठीशी असल्याचा संदेश गेला.

यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील घोषणेनुसार तुळजापूर मतदारसंघाला अधिक निधी मिळाला. त्यातूनच समीकरणे अशी बिघडत गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांनाही महत्त्वाची खाती मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ज्या पक्षामुळे मंत्री होता आले नव्हते तेच आता सत्तेत सहभागी झाल्याची सलही सावंतांच्या मनात निर्माण होणे साहजिक होते.

नांदेडच्या घटनेनंतर आऱोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन अधिष्ठातांना स्वच्छतागृहांची सफाई करायला लावली. त्यानंतर खासदार पाटील यांच्यावर अॅट्रॅासिटीचा गुन्हा दाखल झाला. या घटनेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत, असा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. विरोधकांनी मुश्रीफ आणि सावंत यांच्या राजीनाम्यांची मागणी लावून धरली आहे. त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी धक्कादायक विधान करत नांदेडच्या घटनेला राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. याद्वारे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे.

आपल्याला बाजूला सारले जात आहे, आपण पुन्हा चुकीच्या कंपूत आलो, अशी भावना सावंतांच्या मनात निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यातूनच हा स्फोट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजकारणात कुठेतरी, कुणाशी तरी जमवून घ्यावे लागते. सावंतांचे मात्र कुणाशीही जमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सावंतांची खरी कसोटी विधानसभा निवडणुकीत लागणार आहे.

त्यांच्या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार) गट माजी आमदार राहुल मोटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. मोटे हे पवार कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक आहेत. अर्थात ते आमदार राणाजितसिंह पाटील यांचेही नातेवाईक आहेत. अजित पवार हे महायुतीत सहभागी असले तरी जवळचे नातेवाईक असलेल्या राहुल मोटे यांना ते विरोध करतील का, याबाबत शंका आहे. सावंत हे चक्रव्यूहात अडकले आहेत, हा चक्रव्यूह ते कसा भेदतात, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT