Maratha Kranti Morcha, Aurangabad
Maratha Kranti Morcha, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

सर्वसमावेशक प्रश्नांसाठी आंदोलन केले तर संभाजीराजें सोबत; अन्यथा गादीला मान म्हणून पाठिंबा

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : खासदार संभाजीराजेंनी सर्वसमावेशक प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन केले तरच त्यांच्यासोबत सक्रीय राहू, अन्यथा शिवरायांच्या गादीला मान देऊ सकल मराठा समाजाचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारकडून सोडवून घेण्यासाठी लढा देऊ, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने (Maratha reservation) घेतली आहे. सरकारचे मराठा समाजाच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, या विरोधात उद्रेक होण्यापूर्वी खासदार संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosle) यांनी प्रमुख सहा प्रश्न घेऊन २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Aurangabad)

या आंदोलना संदर्भात भूमिका घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने औरंगाबाद बैठक संपन्न झाली. आम्ही शिवरायांच्या गादीला मान देऊन अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत आहोत. परंतु संभाजीराजे यांनी सर्वसमावेशक प्रश्न घेऊन आंदोलन केले तर सक्रीय सहभाग नोंदवू, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.

मराठा आरक्षणाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुंबईत होणाऱ्या उपोषणाच्या मागणीत महत्वाच्या मुद्यांचा समावेश करावा व त्यात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे विधेयक तथा घटना दुरुस्ती केंद्र सरकारने मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.

या बैठकीत दाते पाटील म्हणाले, एक अध्यादेश काढुन तात्काळ आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि केंद्र शासनाने नेमलेल्या खासदार सुदर्शन समितीच्या शिफारशींचे जे बील लोकसभा व राज्यसभेच्या पटलावर प्रलंबित आहे ते मराठा,जाट,गुज्जर,पाटीदार, मुस्लीमांसह इतर अनेक वंचित समाजाला न्याय देणारे असल्याने तात्काळ स्वीकारले जावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी करावी, त्यासाठी उपोषणाचा इशारा देखील द्यावा.

आईच्या जातीचे प्रमाणपत्र इतर राज्यात मुलांना वापरता येते, त्याच प्रमाणे महाराष्ट्रानेही तो निर्णय घ्यावा. मराठवाड्यातील आरक्षणाचा मुद्दा काहीसा वेगळा आहे. मराठवाडा पूर्वी निजाम राजवटीत होता. उशिराने महाराष्ट्रात सहभागी झाला. आंध्र प्रदेशमध्ये मराठा समाजास इतर मागासवर्गीय जातीचा दर्जा होता. तोच कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाने आदेश द्यावा, या मुद्याचाही आंदोलनाच्या मागण्यांमध्ये समावेश केला जावा, अशी मागणी देखील बैठकीत करण्यात आली.

यावेळी अनेक वक्त्यांनी संभाजी राजेंनी केवळ सहा प्रश्नच का घेतले? राज्य सरकार विरोधातच आंदोलन का? केंद्र सरकारच्या विरोधात का नाही ? असे प्रश्न उपस्थित केले. मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी जातीचे प्रमाणपत्र मिळावे, केंद्र सरकारने घटना दुरूस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी, यासह विविध प्रश्नांसाठीही अन्नत्याग आंदोलनात आवाज उठावला जावा, अशी भूमिका जाहीर करून संभाजीराजेंच्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. एकूण दहा प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणाऱ्या या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यामध्ये राज्यातील मराठा समन्वयकांनी सहभागी होण्याचा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान औरंगाबादेतही आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

क्रांती मोर्चाच्या अन्य मागण्या

समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान टाळण्याच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलना नंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, सारथी विकासाचा आराखडा व आगामी अर्थसंकल्पात निधी विषयीची स्पष्टता करावी, सारथीचे कोल्हापूर येथे केंद्र, नाशिक येथे वसतिगृह इमारत आकारास येऊ शकली नाही, त्या बाबतचा निर्णय घेतांना सर्वच महसुल विभागात सारथीची विभागीय केंद्र देण्याचा निर्णय घ्यावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधी बाबतचाही निर्णय घ्यावा.

जिल्हानिहाय वसतिगृहाचा निर्णयही ठाणे वगळता अन्यत्र अमलात आणलेला नाही. कोपर्डी खटल्यातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेल्या अपिला संदर्भाने सरकारने अर्ज दाखल करण्याचेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांच्या वारसांना नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तताही झालेली नाही, या मुद्यांवरही बैठीकत चर्चा झाली.

बैठकीत मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, अभिजीत देशमुख, किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुढेकर, विजय काकडे,प्रा. प्रदीप साळुंके, प्रा.माणिक शिंदे,सुनील कोटकर,सुरेश वाकडे ,रवींद्र काळे, शैलेश भिसे, सुवर्णा मोहिते,सुकन्या भोसले, पंढरीनाथ गोडसे,निलेश डवले, कल्याण शिंदे, योगेश बहादूरे,संतोष काळे, गजानन पवार, अशोक मोरे, अरुण नवले, राहुल पाटील,स्वाती नकाते,रेखा वाहटूळे,विष्णू मोगले, गणेश उगले, अंकत चव्हाण आदीं सह अनेक सेवक,समन्वयक, पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT