Amit Deshmukh, Sharad Pawar
Amit Deshmukh, Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

'शरद पवार यांनी लक्ष घातले तर उदगीर जिल्हा होऊ शकतो'

सरकारनामा ब्यूरो

उदगीर : आज (ता. 22 एप्रिल) 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लातूर जिल्ह्यातील उदगीर (Udgir) येथे सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी उदगीर जिल्हा निर्मितीचा विषय काढत उदगीरला (Udgir) जिल्हा करणे आपल्या आवाक्या बाहेर असल्याचे म्हटले आहे. या जिल्ह्याची निर्मिती करायची असल्यास त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या योगदानाची गरज आहे. त्याचबरोबर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी याकडे लक्ष घातल्यास उदगीर जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते, असे मत अमित देशमुखांनी व्यक्त केले आहे.

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उदगीर इथे सुरूवात झाली आहे. 22 ते 24 एप्रिल या तीन दिवसात हे साहित्य संमेलन होणार आहे. आज संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात हा विषय प्रास्ताविक करत असतांना संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी मांडला होता. त्यावर बोलतांना अमित देशमुखांनी आपले मनोगत व्यक्त व्यक्त केले.

देशमुख म्हणाले की, उदगीरला जिल्हा करणे हे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे. उदगीरला जिल्हा करायचे असल्यास बीड आणि नांदेडचे सहकार्य आणि योगदान आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या योगदानाची गरज आहे. त्याचबरोबर या विषयात शरद पवार साहेबांनी लक्ष घातल्यास उदगीर जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते, असे म्हणत देशमुखांनी मोठ्या हुशारीने जिल्हा निर्मितीचा हा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात टोलावला आहे.

दरम्यान, उदगीर हा लातूर जिल्यातील महत्वाचा तालूका आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले उदगीर पूर्वी बीदर जिल्ह्यात होते. पुढे राज्य पुनर्रचनेनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात हा तालुका आला. आणि नंतर ३७ वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात उदगीरचा समावेश झाला. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी उदगीर येथे दूध भुकटी प्रकल्प, पशु वैद्यकीय महाविद्यालय, श्यामलाल अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन सुरू केले होते. मात्र, आता दूध भुकटी प्रकल्पही बंद पडला आहे. प्रशासकीय सोयीसाठी गेल्या अनेक वर्षापासून उद्गीरला जिल्हा करण्याची मागणी होता आहे. आज येथे सुरू झालेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात हा मुद्दा पुन्हा लातूरचे पालमंत्री देशमुखांनी काढत आपण या जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवून दिले. मात्र, याचवेळी हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचे असल्याचेही त्यांनी म्हटले असून पवारांनी याकडे लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT